Sillod News: Illegal sand transportation in Sillod taluka overnight, team only on paper
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात रात्रभर अवैध वाळू वाहतूक सुरू असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करून ठेव-लेला आहे. केहऱ्हाळा शिवारात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाळूसाठा केलेला असून, महसूल विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात अवैध वाळू वाहतूक खुलेआम सुरू आहे. तालुक्यातील बोरगाव बाजार, सिसारखेडा, के-हाळा, धानोरा, दीडगाव, उपळी, पिंपळगाव पेठ, मोढा, बोरगाव कासारी, भवन, पळशी, खोडकाईवाडी आदी ठिकाणांहून रात्रभर वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे. नुकतेच उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण सेवानिवृत्त झाले. तर तहसीलचा कारभार प्रशिक्षणार्थी महिला तहसीलदार यांच्याकडे आहे.
महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतूकीला लगाम लावण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. मात्र हे पथक फक्त कागदावरच असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. रात्रभर अवैध वाळू उपसा करुनही महसूल विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
राजकीय वरदहस्त असल्याने वाळू तस्करांची मुजोरी भलतीच वाढली असून पूर्णा, अंजना, खेळणा नद्या अक्षरशः ओरबाडल्या आहे. याचा परिणाम विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाणी पातळीवर देखील होत आहे.
तहसीलदार संजय देवराये यांनी तालुक्यातील वाळू साठा जप्त केला होता. एवढेच नव्हे तर शेत मालकांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवल्याने वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र महसूल कर्मचारी व संजय देवराये यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर तहसीलदार देवराये रजेवर गेले. तसे ही सिल्लोड तहसीलला अधिकाऱ्यांचे ग्रहण लागलेले आहे.
सिंघम अधिकाऱ्यांची गरज
द तालुक्याला सिंघम अधिकाऱ्यांची गरज आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांनी अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावला होता. राजकीय दबाव जुगारून त्यांनी सिंघम स्टाईल कर्तव्य बाजावल्याने तालुक्यातून त्यांची स्तुती केली जात होती. मात्र त्यांची बदली झाली व तालुक्यात पुन्हा अवैध वाळू वाहतूक बोकाळली. ही बदली राजकीय दबावाखाली झाल्याची चर्चा त्यावेळी होत होती.
कारवाईची मागणी
तालुक्यातील केळा शिवारात अनेक ठिकाणी वाळूसाठा करण्यात आलेला आहे. केहऱ्हाळा - गेवराई सेमी रस्त्यावरील गायरान जमिनीत तसेच रस्त्याच्या कडेलाही वाळूसाठा करुन ठेवण्यात आलेला आहे. शिवाय याच शिवारात पाहणी केली, तर अनेक ठिकाणी वाळूसाठा निदर्शनास येईल. मात्र महसूल विभाग बघ्याची भूमिका बजावत असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? हा खरा प्रश्न आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.