Severe Scarcity Crisis Grips Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनचे आगमन लांबल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावले आहे. विभागातील लहान मोठ्या सर्व धरणांमध्ये सरासरी केवळ २७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून आजघडीला विभागातील २४४ गावांसह ९६ वाड्यांना प्रशासनाकडून ४१३ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जायकवाडी, मांजरासह मोठ्या धरणांतील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित केला आहे.
मराठवाड्यात लहान-मोठी सर्व मिळून ९२९ धरणे आहेत. या धरणांची एकत्रित पाणीसाठवण क्षमता २१२६ दलघमी इतकी आहे. मात्र सध्या या धरणांमध्ये एकूण ३७९० दलघमी म्हणजे केवळ २७ टक्के इतकाच साठा उरला आहे. त्यात यंदा जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे एप्रिलपासून सुरू असलेली पाणीटंचाई आणखीनच तीव्र झाली आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागातील छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत २२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आजघडीला विभागातील २४४ गावांसह २६ वाड्यांना २१ शासकीय आणि ३९२ खासगी अशा एकूण ४१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन आणखी लांबल्यास भविष्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवू शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने मराठवाड्यातील जायकवाडी, मांजरासह सर्व धरणांमधील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित केला आहे. या धरणांमधून शेतीची पाण्याची आवर्तने बंद करण्यात आली आहेत.
टंचाईस्थिती विचारात घेऊन धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. १२ जून रोजी जायकवाडीतून सुरू असलेले आवर्तन बंद करण्याबाबत पत्र आलेले आहे. त्यानुसार कार्यवाही झालेली आहे. उद्योगांच्या पाणी कपातीची सध्या आवश्यकता नाही. भविष्यात परिस्थिती गंभीर झाली तर त्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल.- विनय गौडा जी. सी., प्रभारी विभागीय आयुक्त