Savkheda Gram Panchayat ranks first in the district in the Bhonga initiative of the study
राजू वैष्णव
सिल्लोड : तालुक्यातील सावखेडा वु. ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज उपक्रमात सहभाग घेतला आहे. गावातस्वच्छता, सीसीटीव्ही, शाळांचे सुशोभीकरण, अभ्यासाचा भोंगा आदी उपक्रम हाती घेत राबवले. यात अभ्यासाचा भोंगा या उपक्रमात ही ग्रामपंचायत राज्यात दुसरी तर जिल्ह्यात पहिली आली आहे.
गावाची धुरा सांभाळताना गाव कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. यात एकीकडे गावाची धुरा, तर दुसरीकडे विरोधक अशातून गावाचा विकासाची जबाबदारी ही गावाच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांवर असते. याला गावकऱ्यांची साथ मिळाली तर मात्र हे सहज शक्य असल्याचे सावखेडा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या एकजुटीने दाखवून दिले आहे.
सावखेडा बुद्रुक, व खुर्द अशी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. दोन्हीं गावांतील अंतर अवघे दोन किमीचे असून, तीन हजारांच्या जवळपास दोन्ही गावांची लोकसंख्या आहे. या ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज उपक्रमात सहभाग घेतला. वनराई बंधारे, गावात स्वच्छता, शाळांचे सुशोभीकरण, मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, रोजगार निर्मिती, महिला बचतगट सक्षमीकरण आदी उपक्रम हाती घेत राबवले.
तर हल्ली टीव्ही, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने गावात अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू करण्यात आला. तर यासाठी सरपंच काशिनाथ गोरे, उपसरपंच प्रभाकर गोंगे, ग्रामसेवक व्ही. एस. ढोंगे यांनी ग्रामसभा घेत संकल्पना मांडली. याला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला व उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सरपंच काशिनाथ गोरे यांनी सांगितले.
अभ्यासाचा भोंगा म्हणजे काय ?
साखर कारखाने, कंपन्यांमध्ये एक भोंगे बसवलेले असतात. त्या भोंग्याच्या वाजणाऱ्या सायरनवर कामगारांची जाण्यायेण्याची वेळ ठरलेली असते. असाच एक भोंगा गावात टॉवरवर बसवलेला आहे. हा भोंगा सायंकाळी ७ व सकाळी ५ ला वाजतो. भोंगा वाजल्यानंतर २ तास घरातील टीव्ही व मोबाईल बंद केले जातात. तर या ४ तासात विद्यार्थी अभ्यास करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होत असून, पालकही पाल्यांच्या अभ्यासावर लक्ष देत आहे
टीव्ही, मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. तर मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर देखील परिणाम होत आहे. सावखेडा ग्रामपंचायतने सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. हा उपक्रम सर्व ग्रामपंचायतींनी राबवला, तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल. यासाठी ग्रामपंचायतींसह ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन हा उपक्रम गावागावात सुरू करावा यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू.रत्नाकर पगार, गटविकास अधिकारी, सिल्लोड