Jayakwadi Dam Jal Pujan
पैठण : यंदा गोदावरी खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात समाधानकारक जलसाठा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ८) जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचे जलपूजन पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, महापौर राजू राजुरकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, नगरसेविका हर्षदा शिरसाट, भूषण कावसानकर, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, धरण अभियंता श्रद्धा निंबाळकर, तुषार विसपुते, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, गणेश खरडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सतीश आंधळे, नामदेव खरात आदी उपस्थित होते.
जायकवाडी धरण हे मराठवाड्याच्या सिंचन, पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. यंदा गोदावरी खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी तसेच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जलपूजनाच्या निमित्ताने धरण परिसरात उपस्थित मान्यवरांनी जायकवाडीतील जलसाठ्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. उपलब्ध पाण्याचे आगामी काळात काटेकोर नियोजन करणे, शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आणि या जलसाठ्याचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळवून देण्यावर भर देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यंदा जायकवाडी धरणात झालेला मुबलक जलसाठा मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. या पाण्यामुळे आगामी रब्बी हंगामासह विविध पाणीवापराच्या गरजांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पैठण येथील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.