Sambhajinagar will become superfast due to increasing industrialization
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाढते औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकासाच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर शहराचा आगामी दोन-तीन दशकांत अभूतपूर्व विस्तार होणार आहे. शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार (सीएमपी), पुढील २५ वर्षांत (२०५२ पर्यंत) शहराची लोकसंख्या आजच्या तुलनेत दुप्पट, तर रोजगाराच्या संधी तब्बल तिप्पट वाढण्याचा अंदाज आहे. या प्रचंड वाढीमुळे भविष्यात उद्भवणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात 'मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम' (एमआरटीएस) उभारण्याची तयारी आजपासूनच करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
लोकसंख्या आणि रोजगार वाढल्याने शहरातील प्रवासाची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढून याचा सर्वाधिक दबाव प्रमुख वाहतूक मार्गावर जाणवेल. सीएमपीच्या अंदाजानुसार, २०५२ पर्यंत काही प्रमुख मार्गावरील प्रवासी मागणी दुपटीपेक्षा अधिक, तर काही मार्गावर चारपटीहून अधिक वाढू शकते. विशेषतः पीक अवरमधील सुमारे ७५ टक्के प्रवास रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित असल्याने सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळेत जलद, विश्वासार्ह आणि मोठ्या क्षमतेची सार्वजनिक वाहतूक शहराची मूलभूत गरज बनेल.
अहवालानुसार, विद्यमान बससेवेत अनेक मार्गांवर सरासरी केवळ दोन ते तीन बस उपलब्ध असून, बसची वारंवारता सुमारे ५४ मिनिटांची आहे. शहराचा विस्तार आणि प्रवासाची मागणी लक्षात घेता ही व्यवस्था पुरेशी ठरणार नाही. २०५२ पर्यंत सिटी बस, फीडर आणि मास रॅपिड ट्रान्झिटचा एकत्रित ताफा सध्याच्या तुलनेत सुमारे पाचपट वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
त्यानूसार सुमारे ४८ किमी ट्रंक मास ट्रान्झिट कॉरिडॉर आणि ३२० किमी फीडर कॉरिडॉरची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन-शेंद्रा आणि रेल्वे स्टेशन-मुकुंदवाडी या प्रमुख दिशांना जोडणारी सुमारे ३८ किमी एमआरटीएस प्रणाली विकसित करण्याची शिफारसही केली आहे. पुढील टप्प्यांत या नेटवर्कचा विस्तार करता येईल.