Sambhajinagar Water Resources Department warns of stopping water supply
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणातील नाथसागरातून शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या देयकांबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला कडक इशारा दिला आहे. प्रलंबित पाणीपट्टीसह चालू देयकाची रक्कम तातडीने अदा करावी, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस जलसंपदा विभागाने मनपाला बजावली आहे.
शहराचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत जायकवाडी धरण असून, या जलसाठ्यातून महापालिका पाणी उचलते. या पाण्याचे आरक्षण जलसंपदा विभागाने निश्चित केले असून, त्या बदल्यात महापालिकेला दरमहा पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही काळापासून ही रक्कम नियमित न भरल्याने थकबाकीचा डोंगर वाढला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यात थकीत रक्कम वसुलीसाठी जलसंपदा विभागाने ही नोटीस पाठवली आहे.
याबाबत माहिती देताना महापालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत जलसंपदा विभागाला १० कोटी ५८ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. तसेच चालू आर्थिक वर्षातही आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख रुपये भरले आहेत. जलसंपदा विभागाच्या इशाऱ्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.