Sambhajinagar News: Problems in Shivajinagar subway continue
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाचे पाणी तुंबल्याने तर कधी वाहन अडकल्याने शिवाजीनगर भुयारी मार्गातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून आता लोखंडी कमान बसवण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. मात्र हे काम बंद असल्याने वाहनांना ये - जा करण्यास अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या मार्गाच्या अडचणी कधीपर्यंत संपतील असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवाजीनगर भुयारी मार्गातील समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली कामेच आता नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहेत. भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावर नवीन लोखंडी कमान उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी काम सुरू केले.
यात मार्गाच्या सुरुवातीला जेसीबीच्या सहाय्याने सिमेंटचा कठडा तोडून खोदकाम करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून काम बंद आहे. तसेच सध्या या ठिकाणी केवळ लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले असून भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान गत 1 पावसाळ्यात या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक काही काळासाठी बंद ठेवावी लागली होती.
याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने पाण्याच्या निचऱ्याची तपासणी सुरू केली आहे. तर शनिवारी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून पाण्याचा प्रवाह आउटलेटपर्यंत व्यवस्थित जातो का, याची पाहणी करण्यात आली. तसेच निचऱ्याची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर पुढील कामाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अर्धवट अवस्थेतील कामामुळे नागरिकांना सध्या मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
कधीपर्यंत पूर्ण होणार काम ?
भुयारी मार्ग परिसरात खोदकाम करण्यात आले आहे. मात्र हे काम थांबवण्यात आल्याने नागरिक संभ्रमात आहेत. अरुंद झालेल्या मार्गामुळे वाहनांची कोंडी वाढत असून रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने कामाचा वेग वाढवून अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.