Sambhajinagar Heavy rain expected in the city and surrounding areas for the next 48 hours
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरासह परिसरात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रविवारी रात्री नऊ नंतर पावसाने शहरपरिसरात उशिरापर्यंत दमदार हजेरी लावली.
गेल्या आठवडाभरापासून अधूनमधून सुरू असलेल्या हलक्या सरींनी उकाड्यापासून दिलासा दिला होता. मात्र आता मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी पुढील ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी सावधानता बाळगत अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, वादळीवाऱ्याच्या किंवा विजेच्या कडकडाटवेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
नदी-नाले आणि धोकादायक भागाजवळ जाणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर पावसाचे प्रमाण वाढले असून, त्याचा परिणाम पुढील ४८ तास शहरासह परिसरावर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात दरवर्षी १८ ते १९ सप्टेंबरच्या आसपास मान्सून सक्रिय होत असतो, मात्र यंदा तीन दिवस आधीच मान्सून सक्रिय झाला आहे. आज राज्यात सगळीकडेच धुवांधार पाऊस सुरू असून, राज्यात मान्सून १० ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. त्यामुळे राज्यात या तारखेपर्यंत परतीचा पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर उभे राहू नये, पाणी साचलेल्या रस्त्यांवर वाहन चालवताना काळजी घ्यावी, झाडे व विजेचे खांबांपासून अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.