संभाजीनगरची अभिप्राय प्रणाली आता राज्यभरात File Photo
छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरची अभिप्राय प्रणाली आता राज्यभरात

शासनाने काढले आदेश, नागरिकांना नोंदविता येणार सहज तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar feedback system is now being implemented across the state

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना त्यांच्या तक्रारी सहज नोंदविता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व महसुली कार्यालयांमध्ये सूचना व तक्रार पेटीसह क्यूआर कोर्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने यात अन्य काही बाबींचा समावेश करत नागरिक अभिप्राय प्रणाली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात लागू केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय तसेच तलाठीस्तरापर्यंत विविध कामानिमित्ताने नागरिक जातात. परंतु नागरिकांची कामे वेळ-`वर होत नसल्याची ओरड केली जाते. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना येणारे अनुभव, तक्रारी वा सूचना थेट जिल्हा प्रशासनापर्यंत मांडता याव्यात यासाठी नागरिक अभिप्राय प्रणाली हा उपक्रम जून २०२५ मध्ये हाती घेतला होता. यात जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते तहसील, उपविभागीय अशा सर्व कार्यालयात दर्शनी ठिकाणी तक्रार पेटी लावण्यात आल्या. सोबतच क्यूआर कोड सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली.

तक्रार पेटीत तक्रार वा सूचना लेखी स्वरुपात द्या अथवा फक्त क्यूआर कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करा आणि आपली तक्रार वा सूचना नोंदवा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. आलेल्या तक्रारी, सूचनाबाबत नियमित आढावा देखील प्रशासनामार्फत घेतला जात आहे. या उपक्रमाची दखल शासनाने घेत व त्यात नव्याने काही बदल करत नागरिक अभिप्राय प्रणाली आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात कार्यान्वित करण्याचे शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत.

यात नागरिकांकडून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे अभिप्राय प्राप्त करून घेण्यासाठी एक सुसूत्रीत कार्यपद्धती राबविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांसाठी अभिप्राय प्रारूप उपलब्ध करून देण्यात यावे. हे अभिप्राय प्रारूप अभिप्राय पेटी जवळच उपलब्ध असावे.

शासकीय कार्यालयास भेट देणाऱ्या नागरिकांना सदर अभिप्राय सादर करण्यासाठी कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवण्यात यावी. अभिप्राय प्रारुपांमध्ये नागरिकांना कार्यालयीन स्वच्छता, सेवा देण्याची पद्धत, नागरिकांशी वागणूक, कामकाजातील सुलभता, या मुद्द्यांवर १ ते ५ इतके गुणांकन सादर करता येईल तसेच त्यांना आलेल्या अनुभवांवर मुक्त स्वरूपात त्यांचे अभिप्राय नोंदवून सदर अभिप्राय कुलूपबंद पेटीमध्ये टाकता येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे.

अभिप्राय पेटी पाच तारखेला उघडावी

अभिप्राय पेटी दरमहा ५ तारखेला किंवा त्या दिवशी सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी कार्यालयीन प्रमुख किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात यावी, ही कार्यवाही कर्मचारी व नागरिकांच्या साक्षीने करावी, सर्व सूचनांचे व अभिप्रायांचे वाचन करून त्यांचे स्वरुप व आशयनुसार परीक्षण करावे, अभिप्रायांची नोंदवहीत घ्यावी. कार्यालयाच्या स्तरावर तत्काळ अंमलात आणता येणाऱ्या उपयुक्त व व्यवहार्य सूचनांची अंमलबजावणी संबंधित कार्यालयप्रमुखांनी तत्काळ करावी आदी निर्देश शासन आदेशात देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT