Ruling Party Members Absent from District Electricity Committee Meeting
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील जनतेला विजेबाबत काही समस्या, काही नवीन सुविधा तसेच नागरिकांच्या वतीने काही सूचना असतील तर त्या महावितरणला सुचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते, या समस्या मांडण्यासाठी दर तीन महिन्यांला जिल्हा विद्युत समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीला सत्ताधारीतील आमदारानींचा दांडी मारल्याने येथील लोकप्रतिनिधींना वीज प्रश्नांचे गांभीर्य नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
जिल्हा विद्युत समितीची बैठक तब्बल दोन वर्षांनंतर शनिवारी (दि.१६) महावितरणच्या मुख्यालयात पार पडली. या बैठकीला दोन्ही सभागृहांचे संसद सदस्य उपस्थित राहून आपापल्या भागातील समस्या तसेच आवश्यक सुधारणा यावर भाष्य करणे अपेक्षित होते.
दरम्यान वीजप्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अब्दुल सत्तार, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. प्रशांत बंब, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ, आदींनी या बैठकीकडे फिरकलेच नाहीत.
समिती जुनीच सदस्य नवीन
२०२४ ला नवीन खासदार, आमदार निवडून आले. त्यावेळी जिल्हा विद्युत समितीचे गठण करणे आवश्यक होते. दरम्यान या बैठकीला कागदावर समिती जुनीच होती, परंतु बैठकीला सदस्य मात्री नवीन होते. यातूनच समितीचे गठणचे गांभीर्य दिसून येत आहे. तत्कालीन तसेच विद्यमान जिल्हाधिकारी यांनीही समिती गठित केली नाही, महावितरणनेही या बाबत पाठपुरावा केला नसल्याने जुन्याच बाटलीत नवीन दारू अशी स्थिती झाली होती.
ग्रामीण व शहरी भागातील वीजविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच वीजगळती कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधींनीच्या वतीने पायाभूत सुविधा, बळकटीकरणांवर काय सुधारणा कराव्यात याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव किंवा सूचना आल्या नाहीत. त्यामुळे ही बैठक केवळ हसत खेळत पार पडली.
लोकप्रतिनिधींना गांभीर्य नाही
जिल्ह्यात विजेबाबत अनेक प्रश्न आहेत. वारंवर होणारी वीज गुल, सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत लागणारा वेळ, शेतकऱ्यांच्या अडचणी, वारंवार विस्कळीत होणारी वीज वितरण व्यवस्था यावर बोट ठेवून लोक प्रतिनिधींनी याबाबत गांभीयनि चर्चा केली नाही. केवळ अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरून, नंतर उणेदुणे, तसेच राजकीय चिमटे, काढत बैठक संपवण्यात आली. या बैठकीला ना शेतकरी आले, ना काही अडचणी घेऊन येणारे वीज ग्राहक आले.