छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक प्रवेशापूर्वी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणे गरजेचे आहे. दरम्यान येत्या ४ जूनला उपोषणाला बसणार असल्याचे सांगत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे आपण उपोषणावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली. जरांगे यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी रविवारी (दि.१९) ते माध्यमांशी बोलत होते.
जरांगे पुढे म्हणाले, समाज बांधवांची इच्छा होती मी उपोषण करू नये. मात्र त्यांच्याच लेकराच्या भविष्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे उपोषणाला राज्यातील घराघरातील मराठा समाज अंतरवाली सराटीत असेल. मी राजकारणात येण्यात इच्छुक नाही. मात्र सगे सोयऱ्याची अंमलबजावणी व मराठा कुणबी एक असल्याचा कायदा केला नाही, तर समाजाला सत्तेत घालून निवडणूक लढवावी लागेल (Maratha Reservation) असेही जरांगे म्हणाले.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देखील मराठा समाजाने ताकदीने मतदान (Maratha Reservation) करा. मराठा समाजाने लेकरं डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीत मतदान करा. नाशिकच्या उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. माझा कोणालाच पाठिंबा नाही, असेही जरांगे म्हणाले.
मुंडे बंधू भगिनी चर्चेला आले तर चर्चा करणार का ? यावर जरांगे म्हणाले, वंजारी आणि मराठ्यांचं कधीच काही झाले नाही. निवडणुकीत अनेक मराठे त्यांच्या बाजूने उभा राहिलेत मराठे त्यांचे विरोधात नाहीत. मात्र त्यांचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतात. मग त्याची फळे त्यांच्या मोठ्या नेत्यांना भोगावे लागतात.
जरांगे म्हणाले, ते मुद्दामून करत आहेत. त्यांचेच लोक त्यांनाच पाडणार आहेत आणि ते आपलं नाव घेतील. त्यामुळे तुम्हीं उपोषणाच्या तयारीला लागा. तसेच शांत रहा, फक्त काय काय घडतय यावर बारकाईने लक्ष ठेवा.