Raise the call of patriotism through the Kalash Vandhan Yatra
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी देशाला एकजूट करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. त्याअंतर्गत जगद्गुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त देशभरात समर्पित समरसता संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या कलश वंधन यात्रेतून देशभक्तीचा नारा द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.७) मुकुंदवाडी येथे आयोजित पवित्र कलश वितरण कार्यक्रमात केले.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार माधवी नाईक, आमदार बबन लोणीकर, संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, आमदार सुहास शिरसाट यांच्यासह सुदर्शन महाराज, राजेश महाराज, रामेश्वर महाराज, सिद्ध चैतन्य महाराज, स्वामी सदानंदगिरी महाराज यांच्यासह विविध पंथाचे महंत उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, संत गुरु रविदास महाराज यांनी आयुष्यभर समता, सामाजिक न्याय, बंधुता, मानवता आणि समरस समाजव्यवस्थेचा संदेश दिला. त्यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त भाजपने महाराष्ट्रभर 'समर्पित समरसता संकल्प अभियान' हाती घेतले आहे.
या अभियानाद्वारे संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वंधन कलशांचे वितरण, संतांच्या विचारांचे स्मरण, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात विविध धर्म, पंथ आणि संप्रदायातील संत-महंत एका व्यासपीठावर एकत्र येऊन संत गुरु रविदास महाराजांच्या विचारांना अभिवादन केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस गौतम यांनीही उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.