अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये तब्बल १२ कोटी ४७ लाख रुपये खर्चुन वृक्षारोपण व तीन वर्षांच्या देखभालीसाठी निविदा मंजूर केली, मात्र या निधीतून नेमकी किती झाडे कुठे लावली, त्यापैकी किती झाडे जिवंत आहेत, याची कोणतीही अधिकृत नोंद विभागाकडेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. असे असतानाही नव्याने १२ कोटी ६७ लाख रुपयांच्या वृक्षारोपणाची निविदा काढून कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.
राज्य शासनाकडून दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला हिरवळ निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे निर्देश दिले जातात. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेवर विशेष भर देण्यात आला आहे. मात्र केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, ती किमान तीन वर्षे जिवंत ठेवणे, त्यांची नियमित देखभाल करणे, आवश्यकतेनुसार ट्री-गार्ड बसविणे किंवा पाच ते सात फूट उंचीची रोपे लावून त्यांचे संगोपन करणे अशा स्पष्ट अटी शासनाने निविदेत नमूद केल्या आहेत.
या अटींनुसार कंत्राटदाराने लावलेली झाडे निर्धारित कालावधीत जिवंत राहिल्यानंतरच संबंधित देयके अदा करावीत, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही प्रत्यक्षात झाडांचे अस्तित्व, त्यांची देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याची कोणतीही पडताळणी न करता निधी खर्च झाल्याचा आरोप होत आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कडेला सुमारे १४ हजार झाडे लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र ही झाडे नेमकी कोणत्या मार्गावर लावली, त्यांची सद्यस्थिती काय आहे, किती झाडे जिवंत आहेत, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर निविदेनुसार कोणत्या प्रजातींची झाडे लावायची होती आणि प्रत्यक्षात कोणती झाडे लावण्यात आली, याचीही नोंद विभागाकडे नसल्याची माहिती पुढे आली आहे.
शासनाने तीन वर्षांत जिल्ह्यात ३० हजार ६०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते, मात्र या उद्दिष्टाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, याचा लेखाजोखा नसतानाच २०२६ साठी नव्याने वृक्षारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा उपयोग प्रत्यक्ष हिरवळ निर्माण करण्यासाठी झाला की, केवळ कागदोपत्री वृक्षारोपणापुरताच मर्यादित राहिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिशेबच गायब
सार्वजनिक बांधकाम विभागाने २०२४ मध्ये जिल्ह्यात १२.४७ कोटी रुपयांचे वृक्षारोपण व देखभाल काम मंजूर केले. यात सुमारे १४ हजार झाडे लावल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात झाडे नेमकी कुठे लावली, याबाबत ठोस माहितीच अधिकाऱ्यांकडे नाही. एवढेच काय तर किती झाडे जिवंत आहेत आणि कोणत्या प्रजातींची झाडे लावली, याचाही तपशील गायब आहे.
...तरीही १२.६७कोटींची निविदा
जुन्या वृक्षारोपणाचे मूल्यमापन झालेले नाही.
२०२६ साठी १२.६७ कोटी रुपयांची नवी निविदा.
कंत्राटदार निश्चित; कार्यारंभआदेशही जारी.
जुन्या कामाचा हिशेब नसताना नव्या खर्चावर प्रश्नचिन्ह
प्रशासन झाडे लावली, पण कुठे ?
फर्दारपूर बिल्डिंग परिसरात लावली २७५ झाडे (कोणती बिल्डिंग माहिती नाही, किती जगते माहिती नाही)
फर्दापूर उपविभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला २०९० झाडे लावली (कोणत्या माहिती नाही, स्थिती माहिती नाही)
उत्तर उप विभागांतर्गत रस्त्याच्या कडेला १९१४ झाडे लावली. (कोणत्या ठिकाणी माहिती नाही, जगली किती माहिती नाही)
पैठणमध्ये बिल्डिंग परिसरात ९६ झाडे लावली. (कोणत्या माहिती, काय स्थिती आहे, माहिती नाही.)
सिल्लोडमध्ये रस्त्याच्या कडेला १ हजार ९ झाडे लावण्यात आली. (कोठून कुठपर्यंत माहिती नाही. जगली का, माहिती नाही.)
पैठण रस्त्याच्या कडेला १९७० झाडे लावली, (कोठून कुठपर्यंत माहिती नाही. जगली का, माहिती नाही.)
पैठण नंबर ३ वर रस्त्याच्या कडेला ३ हजार ७ झाडे लावली. (कोठून कुठपर्यंत माहिती नाही. जगली का, माहिती नाही.)
फुलंब्री उपविभागांतर्गत असलेल्या रस्त्याच्या कडेला ३५०७ झाडे लावली. (कोठून कुठपर्यंत माहिती नाही. जगली का, माहिती नाही.)