Water Scarcity : पाणीटंचाईवरून शहरात पेटला राजकीय संघर्ष file photo
छत्रपती संभाजीनगर

Water Scarcity : पाणीटंचाईवरून शहरात पेटला राजकीय संघर्ष

वेळापत्रक बदलावरून शिवसेना - भाजपमध्ये वाद : पुंडलिकनगर जलकुंभावर आंदोलन, मध्यरात्री पाणी सोडल्यानंतर निवळला वाद

पुढारी वृत्तसेवा

Political conflict erupts in the city over water scarcity

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढत्या पाणीटंचाईमुळे आता राजकीय संघर्ष पेटला असून गारखेडा परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलावरून शिवसेना आणि भाजपमध्ये गुरुवारी (दि.११) रात्री वाद निर्माण झाला. पाणीपुरवठा न झाल्याने भाजपचे नगरसेवक अशोक दामले यांनी नागरिकांसह पुंडलिकनगर जलकुंभावर ठिय्या आंदोलन छेडले. अखेर प्रशासनाने रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर परिस्थिती निवळली.

जिल्ह्यात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला विविध भागांतील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गारखेडा परिसरासाठी नव्याने वेळापत्रक निश्चित केले. त्यानुसार रात्री १० ते पहाटे ४ या कालावधीत पाणीपुरवठा टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, पुंडलिकनगर परिसरात गुरुवारी रात्री नियोजित वेळेनुसार पाणी न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली. दरम्यान नगरसेवक अशोक दामले यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता वेळापत्रक बदलल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी नागरिकांसह जलकुंभावर आंदोलन सुरू केले. पाणी मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर महापौर समीर राजूरकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित भागात पाणी सोडण्यात आले.

पाणीवाहिनीच्या श्रेयावरूनही वाद

प्रभाग क्रमांक २७ मध्ये नव्याने टाकण्यात आलेल्या पाणीवाहिनीच्या कामाच्या श्रेयावरूनही भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगल्याची चर्चा आहे. भाजपचे नगरसेवक राजू वैद्य आणि शिवसेनेचे स्वीकृत सदस्य शुभम काळे यांनी या कामाचे श्रेय आपापल्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याचा दावा केल्याने राजकीय वातावरण आणखी तापले.

टंचाई वाढताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

शहरातील वाढत्या टंचाईमुळे पुरवठा व्यवस्थेवर ताण वाढत असून, वेळापत्रकातील बदलांमुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी वाढत आहे. पावसाला आणखी विलंब झाल्यास पाणीप्रश्नावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT