Phases delayed by two days; Water supply disrupted again after restoration
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा उन्हाचे चटके वाढत असतानाच शहरवासीयांना पुन्हा एकदा निर्जळीचा फटका बसला आहे. जायकवाडी येथील पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पाण्याचे टप्पे दोन दिवस लांबणीवर पडले असून, गॅप कमी करण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. असे असले तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जायकवाडी धरणावरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ५६ आणि १०० दलघमी क्षमतेच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार जलवाहिनी फुटणे, जॉइंट निखळणे, अचानक गळती लागणे, तसेच वीज पुरवठा खंडित होणे, ट्रान्सफॉर्मर जळून जाणे, केबल बस्ट होणे यासारखे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
परिणामी, शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होतो. यावर उपाय म्हणून ७५ दलघमी क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. परंतु या योजनेतून जेमतेम २५ एमएलडी पाणी मिळत आहे.
त्यातच १५ दिवसांपूर्वी वीज पुरवठा
खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, पाण्याचे टप्पे दोन दिवसांनी पुढे ढकलले गेल्यामुळे दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. शनिवारी सकाळी जायकवाडी येथील नवीन पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला.
त्यानंतर वीज यंत्रणेत होणारा बिघाड वाढत गेल्याने रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बीज पुरवठा सुरू करून पंपिंग सुरू करण्यात आली. पहाटे ५ वाजता जलकुंभात पाणी आले. मात्र शनिवारी शहरात कुठेही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. त्यामुळे पाण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सर्वच भागांत एकाच वेळी पाणीपुरवठा करता येणार नसल्याने टप्पे दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शहरवासीयांचे बसे कोरडे पडले आहेत.
पाण्याचे गॅप कमी करण्यासाठी धडपड
महापौर समीर राजुरकर यांनी पाणीपुरवठ्याची बैठक घेऊन २५ फेब्रुवारीपर्यंत पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मनपाच्या पाणीप-रवठा विभागाने गॅप कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. चिकलठाणा, मुकुंदवाडी, जय विश्वभारती कॉलनी, हनुमान टेकडी या भागात बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आठ दिवसांवर आणल्याचा दावा प्रशासनाने केला असतानाच, आता पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे.
पाण्याचे टप्पे दोन दिवसांनी पुढे शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यातच शनिवारी बीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. त्यामुळे पाण्याचे टप्पे दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहेत.- किरण धांडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा