Only 2,000 Admissions Under RTE in 20 Days: Deadline Extended to May 8
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आरटीई अंतर्गत गेल्या वीस दिवसांत निम्मेही प्रवेश निश्चित झालेले नाहीत. पालकांकडून कागदपत्रे पडताळणी कमिटीकडे आठ, दहा दिवसांपासून दिलेली आहेत. परंतु, हे अर्ज तसेच प्रलंबित ठेवण्यात येत असल्यामुळे पालकांची हेळसांड होते आहे. शिक्षण विभागाने पुन्हा ८ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग घटकांतील मुलांना मोफत प्रवेश दिल्या जातो. २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्याप ५० टक्केही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होवून २० दिवस झाले. जिल्ह्यात आजपर्यंत केवळ २ हजार एक जागेवर प्रवेश निश्चिती झाली आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत सहा एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली. यानंतर नियमित निवड यादीतील निवड झालेल्या बालकांच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस १० एप्रिलपासून सुरुवात झाली.
सुरुवातीला २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, अद्यापही प्रवेश निश्चितीचे प्रमाण ५० टक्केही नाही. त्यानंतर गुरुवारी शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली. आता ८ मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
आतापर्यंत केवळ २ हजार प्रवेश
जिल्ह्यात २०२६-२७ शैक्षणिक वर्षात आरटीईत सहभागी शाळांची संख्या ५४१ एवढी असून, चार हजार ९११ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. या जागांसाठी १७ हजार २०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. सोडतीनंतर ४,८६६ पात्र विद्यार्थी ठरले. त्यापैकी आजपर्यंत २,००१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. अजूनही २,८६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिक्त आहेत.
जिल्ह्यातील स्थिती..
आरटीईत सहभागी शाळा ५४१
आरटीई प्रवेश क्षमता ४,९११
सोडतीत निवड झालेली संख्या ४,८६६
आजपर्यंत प्रवेश निश्चित संख्या २००१