घोसला : मधमाशांचे घटते प्रमाण, नैसर्गिक आपत्ती आणि परागीकरणातील अडथळ्यांचा फटका यामुळे घोसला परिसरात यंदा कांदा बियाणे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे.
चालू वर्षात सोयगाव तालुक्यात घोसला परिसरात कांदा बियाण्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. चांगल्या प्रतीचे भाव मिळतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हे पीक घेतले होते. विहिरींना उपलब्ध असलेले पाण्याचे चांगले प्रमाण आणि सुरुवातीच्या अनुकूल परिस्थितीमुळे उत्पादन चांगले येईल, असा विश्वासही निर्माण झाला होता. मात्र, हंगामाच्या शेवटी परिस्थितीने पलटी घेतली असून शेतकऱ्यांच्या हाती मोठी निराशा आली आहे.
तालुक्यात मधमाशांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. परिणामी परागीकरणाची प्रक्रिया बाधित झाली. यासोबतच काही भागात नैसर्गिक आपत्तींचाही फटका बसला. या सर्व कारणांमुळे कांदा बियाण्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
साधारणतः 15 क्विंटल कांद्यामागे अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत केवळ 40ते 50 किलो इतकेच बियाणे निघत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कृषी रत्न शेतकरी ईश्वरा सपकाळ यांनी सांगितले की, या वर्षी सुरुवातीला सर्व परिस्थिती अनुकूल वाटत होती. मात्र मधमाशांचे कमी प्रमाण आणि बदलत्या हवामानामुळे परागीकरण नीट झाले नाही. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला.