Onion prices fell; Farmer Sets Fire to 600 Sacks of Onions
ईट, पुढारी वृत्तसेवा : कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे भूम तालुक्यातील तिंत्रज येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील तब्बल ६०० गोणी कांद्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या या कृतीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
भूम तालुक्यातील तिंत्रज येथील कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी स्वतःच्या चार एकर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्यापैकी अडीच एकर क्षेत्रा-वरील कांदा काढणी करून चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत शेतात साठवून ठेवला होता. मात्र मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
सध्या कांद्याला ५० पैसे ते १ रुपये किलो असा अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कांदा पिकासाठी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, सिंचन, वीज, वाहतूक आणि साठवणूक यासाठी लाखो रुपये खर्च करूनही उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने भगवान साबळे यांनी संतापाच्या भरात शेतात ठेवलेल्या कांद्याला आग लावली.
या आगीत अडीच एकरा-वरील सुमारे ६०० गोणी कांदा जळून खाक झाला. या कांदा लागवडीसाठी सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्याच्या बाजारस्थितीत हा सर्व खर्च मातीमोल ठरत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कांदा उत्पादकांना तातडीने अनुदान किंवा आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली...
गेल्या काही वर्षांत शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, सिंचन, वीज, वाहतूक आणि इतर खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र शेतीमालाचे दर सतत घसरत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने अनेक शेतकरी बँका, पतसंस्था आणि खासगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. घरखर्च, मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा भागवणेही कठीण झाले असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.