छत्रपती संभाजीनगर : जिल्हा बँकेच्या २१ संचालक निवडीसाठी दाखल अर्जाची सोमवारी (दि.८) छाननी करण्यात आली. यात पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजना जाधव, रमेश बोरणारे या दिग्गजांसह आ. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांच्या अर्जावरही आक्षेप घेण्यात आला आहे. एकूण १८ आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली. याचा निकाल आज मंगळवारी (दि.९) दिल्यानंतर उमेदवारांची यादी लावली जाणार आहे. दरम्यान, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
यंदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्याचे दोन मंत्री, खासदार आणि पाच आमदारांसह अनेक मातब्बर नेते उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्याचे राजकीय वातावरण गरम आहे. बँकेच्या मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली.
ही छाननी प्रक्रिया सुरू असतानाच १८ उमेदवारांच्या अर्जावर विविध कारणांवरून आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेप नोंदवण्याची मुदत संपल्यानंतर दुपारी अडीच वाजेनंतर त्यावरील सुनावणी प्रक्रिया सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. याचा निकाल मंगळवारी घोषित केला जाईल. त्यानंतरच एकूण वैध व अवैध अर्जाची यादी जाहीर केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, २३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेसाठी ४ जुलैला मतदान आणि ५ जुलैला मतमोजणी होणार आहे.
या उमेदवारांविरोधात आक्षेप
पालकमंत्री संजय शिरसाट, त्यांची कन्या हर्षदा शिरसाट, खा. कल्याण काळे, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव, आ. अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर, अप्पासाहेब पाटील, प्रभाकर काळे, इंदुमती पाटील, शेषराव जाधव, संजय जाधव, राजू पोळ, राजू शिंदे, राजेंद्र ससाने यांचा समावेश आहे. यापैकी आ. संजना जाधव, संजय जाधव, राजू शिंदे आणि राजेंद्र ससाने यांच्या अर्जावर एकापेक्षा अधिक आक्षेप दाखल झाले आहेत.
शिरसाट-शिंदे पुन्हा एकमेकांविरोधात भिडले
विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे राजू शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीतही आमने-सामने आले आहे. मात्र, मतदान होईल त्याआधीच त्यांनी एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेतले आहे. शिरसाट, त्यांची कन्या हर्षदा यांनी राजू शिंदेच्या, तर शिंदे यांनीही या दोन्हींच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. खा. काळेंविरोधात खान वाजीद शब्बीर, अब्दुल समीर यांच्या विरोधात काकासाहेब फरकाडे, तर आ. रमेश बोरणारे आणि अप्पासाहेब पाटील यांनी एकमेकांविरोधात आक्षेप नोंदवला आहे.