Water Scarcity : मराठवाड्यात टँकरची संख्या चारशेच्या घरात, टंचाईचे संकट कायम pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Water Crisis : मराठवाड्यात टँकरची संख्या चारशेच्या घरात, टंचाईचे संकट कायम

जून महिना सुरू होऊनही रोज नव्याने प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

Number of tankers in Marathwada nears 400; water scarcity crisis persists

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जून महिन्यातही मराठवाड्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. परिणामी, टंचाईग्रास्त गावांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. सद्यस्थितीत विभागात 220 गावे आणि 96 वाड्यांना 375 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागातील छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत 92 गावे आणि 36 वाड्यांना 156 टँकरद्वारे पाणीपु वठा सुरू होता. आजघडीला मराठवाड्यातील आठपैकी एकही जिल्हा टँकरमुक्त नाही. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार विभागात टँकरची संख्या 375 वर पोहचली आहे. शिवाय टँकर मंजुरीसाठी रोज नव्याने प्रस्ताव दाखल होत असल्याने टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार गावांतून टँकरची मागणी झाली. उन्हाचा पारा वाढत गेला आणि त्या प्रमाणात टँकरच्या संख्येतही भर पडत असल्याचे चित्र आहे. एप्रिल अखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. सध्या सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न सर्वाधिक गंभीर असल्याचे चित्र आहे. सध्या 140 गावे व 41 वाड्यांना 239 टँकरद्वारे पाणीपु-रवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात 79 टँकरने 48 गावे आणि 31 वाड्यांना पाणी पुरविले जात आहे. परभणी जिल्ह्यात 11, हिंगोली जिल्ह्यात 2, नांदेड जिल्ह्यात 14, बीड जिल्ह्यात 10, लातूर जिल्ह्यात 3 आणि धाराशिव जिल्ह्यात 17 टँकर सुरू आहेत.

अकराशे विहिरी अधिग्रहित

मराठवाड्यात प्रशासनाने 1140 विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये सर्वाधिक 282 विहिरी नांदेड जिल्ह्यात अधिग्रहण करण्यात आल्या असून, त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात 209, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 182, धाराशिव जिल्ह्यात 139, जालना जिल्ह्यात 96, लातूर जिल्ह्यात 109, परभणी जिल्ह्यात 61 आणि हिंगोली जिल्ह्यात 62 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहि-रींमधून सुमारे 945 गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT