Chhatrapati Sambhajinagar Sudden Death Case
छत्रपती संभाजीनगर : तब्बल १५ वर्षे एकमेकांवर जीवापाड प्रेम केल्यानंतर, अनेक कौटुंबिक व सामाजिक अडचणींवर मात करून अवघ्या सात दिवसांपूर्वी ४ जून रोजी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरात घडली आहे. दीपाली लिहिणार असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. लग्नाचे विधी संपण्यापूर्वीच आणि संसार सुरू होण्याआधीच तिचा अंत झाल्याने लिहिणार आणि खंडाळे या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेतील सर्वात चटका लावणारी बाब म्हणजे, मृत दीपाली लिहिणार आणि संदीप खंडाळे यांचा प्रेमप्रवास तब्बल १५ वर्षांचा होता. दीड दशक एकमेकांना सुख-दुःखात खंबीर साथ दिल्यानंतर, अखेर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ४ जून २०२६ रोजी अत्यंत थाटामाटात व आनंदाच्या वातावरणात हा विवाह सोहळा पार पाडला होता. दीड दशकाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून दोन्ही जीव सुखी संसाराची स्वप्ने पाहत होते.
लग्नानंतरच्या पारंपरिक विधींसाठी आणि पाठवणीसाठी दीपाली आनंदाने आपल्या माहेरी आली होती. घरात पाहुण्यांची वर्दळ आणि लग्नाची लगबग सुरूच असताना, संध्याकाळच्या सुमारास दीपाली बाथरूममध्ये गेल्या होत्या. तिथे अचानक त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.