छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना येत्या १२ जूनपासून नवीन पाणीपुरवठा योजनेतून वाढीव पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी एप्रिलपासून जलवाहिनीतून पाण्याची चाचणी घेतली जात असून, या चाचणीतच महापालिकेला दोन महिन्यांत दीड कोटी रुपयांचे वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्याअगोदरच वीज बिलामुळे पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरवासीयांना दररोज मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने अमृत २ योजनेतून २७४० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली. या योजनेतून शहराला पाहिल्या टप्प्यात वाढीव २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी मागील चार महिन्यांपासून सुरू आहे. यात २३ मार्चपासून महापालिकेने जायकवाडी धरणावर नव्या योजनेसाठी पाणी उपसा सुरू केला. हे पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी आणि जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी मागणी दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती.
१४ एप्रिल रोजी पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने येत्या १२ जूनपासून या योजनेतून वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु योजना कार्यान्वित होण्याअगोदरच महापालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या डोकेदुखी बनली आहे.
जायकवाडी पंपगृह आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पंपगृहातील वीज बिलापोटी दोन महिन्यांत महापालिकेला तब्बल दीड कोटीचे बिल आले आहे. दरमहा महापालिकेला साडेचार ते पाच कोटींचे वीज बिल भरावे लागते. परंतु जूनमध्ये साडेसहा कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.