पैठण : पुढारी वृत्तसेवा
मराठवाड्याच्या शेती सिंचनासाठी वरदान असलेल्या पैठण येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वरील छोट्या- मोठ्या बंधारे व धरणातून पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे आज (मंगळवार) सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान येथील नाथ सागर धरण ५५.२० टक्के च्या पुढे भरले आहे.
गेल्या चार दिवसांपासून नाथसागर धरणाच्या वरील भागातील नाशिक परिसरातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येथील नाथसागर धरणामध्ये जमा होत आहे. मंगळवारी रोजी सकाळी दहा वाजता धरण नियंत्रण कक्षात नोंद केल्यानुसार पाण्याची आवक ९७ हजार ७७७ क्युसेक सुरू असून, चार टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या नाथसागर धरणात सध्या एकूण पाणीसाठा १९३६.४७२ दलघमी असल्याने धरणाची टक्केवारी ५०.४८ झाली आहे. पाण्याची आवक अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास पाण्याची टक्केवारीत मोठी वाढ होणार असल्याची माहिती धरण उप अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असल्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत, शेतकऱ्यांसह नागरिकांचा पाणी प्रश्न मिटला आहे.