छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. विभागातील 26 गावांमध्ये व 22 वाड्यांना 48 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यासोबतच पाणीपुरवठ्यासाठी 74 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
विभागात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह लातूर जिल्ह्यातील तहानलेल्या 26 गावे आणि 22 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होणे शक्य आहे. या उन्हाळ्यात मार्च महिन्यात विभागातून टँकर मागणीचा प्रस्ताव नव्हता. परंतु उन्हाचा पारा वाढल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 17 गावे व 10 वाड्यांमध्ये 30 टँकरने, जालना जिल्ह्यात 8 गावे 11 वाड्यांना 17 तर लातूरमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात 47 खासगी तर एक शासकीय टँकरने हा पाणीपुरवठा सुरू आहे.
मराठवाड्यातील परभणी, बीड आणि धाराशिव वगळता अन्य जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. प्रशासनाने मराठवाड्यात एकूण 105 खासगी विहिरींचे अधिग्रहण केले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 48, जालना 15, हिंगोली 17, नांदेड 12, लातूर जिल्ह्यातील 13 विहिरींचे अधिग्रहण केले. टँकरसाठी 27 विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त 78 विहिरींचा अधिग्रहणात समावेश आहे.
गतवर्षी होते 215 टँकर
गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाई परिस्थिती काहीशी कमी आहे. गतवर्षी मार्च महिन्यातच विभागात अनेक भागांत टँकरची मागणी सुरू झाली होती. 20 एप्रिल 2025 पर्यंत छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यांतील तहानलेल्या 142 गावे व 24 वाड्यांना मिळून 215 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. पुढच्या एक-दोन आठवड्यात हा आकडा पार होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.