वैजापूर: महाराष्ट्रात काका पुतण्याचा वाद काही नवीन नाही, याच वादातून मुंबईमध्ये राज ठाकरेंचं नेतृत्व घडलं तर मराठवाड्यात धनंजय मुंढे यांचं, आता त्याच मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाऱ्या वैजापूर मतदारसंघात चिगटगावकर काका-पुतण्याच्या वादाला तोंड फुटले आहे. कारण, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी सोमवारी (दि.१७) शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी पुतण्या अभय यांनी पक्षप्रवेश न केल्याने काका पुतण्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुतण्या अभय व काका यांच्यात वादंग उठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वैजापूर मतदार संघ एकेकाळी चिगटगावकर कुटुंबाचा दबदबा असलेला मतदार संघ. माजी आमदार कै. स्वर्गीय कैलास पाटील चिगटगावकर यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. सन २००० साली मात्र शिवसेनेचे स्वर्गीय आर.एम.वाणी यांनी त्यांचा पराभव करत हा बालेकिल्ला सेनेच्या ताब्यात खेचून आणला. त्याला कारण ठरले दोन्ही भांडणामुळे झालेले राजकीय युद्ध. त्यामुळे २०१४ साली या वादाला थांबण्यासाठी कैलास पाटील यांनी माघार घेत बंधू भाऊसाहेब यांनाआपला पाठिंबा जाहीर करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. या पाठिंब्यामुळे तीन टर्म सतत निराशा पदरी पडणाऱ्या भाऊसाहेबांना भावाच्या पाठिंब्यामुळे अखेर गुलाल लागला. मात्र त्यानंतर २०१५ मध्ये कैलास पाटील यांचे निधन झाले. निधनानंतर मुलगा अभय याने नव्या उमेदीने राजकारणात एन्ट्री केली. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक कोण लढणार? याची चर्चा सुरू झाली, मात्र या काका पुतण्यात यावरून राजकीय "खटके" उडाले. मात्र निवडणुकीत दोन्ही भावंडांना राजकीय फटका पडल्याचा अंदाज असणाऱ्या भाऊसाहेबांनी स्वतः माघार घेत अभय याला संधी दिली. मात्र अभय यांचा सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी दारूण पराभव केला.
पराभव होताच अभय यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भारतीय जनता पार्टीत पक्षात प्रवेश केला. मात्र काही वर्ष उलटत नाही तेच, भाजपला रामराम करत त्यांनी बी.आर. एस पक्षात इन्कामिंग केले. मात्र अभय हे तिकडे देखील सक्रिय राहिले नाही. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या काका-पुतण्या दोघांनी शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांना एकत्र पाठिंबा जाहीर करत कुटुंब एकत्र असल्याचा संदेश दिला. मात्र तीन महिने उलटताच काका भाऊसाहेब यांनी शिंदे सेनेत पुतण्याला सोबत न घेता पक्ष प्रवेश केला आणि यामुळे वादाला तोंड फुटले..
काही दिवसांवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. पुतण्या अभय व भाऊसाहेब चिकटगावकरांचा मुलगा अजय हे दोघेही गटातून जिल्हा परिषद लढण्यासाठी इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात आहे. या विचारापोटी पुतण्या अभय यांना पक्षप्रवेशापासून दूर ठेवण्यात आल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
मी काकांचे ऐकून आमदार बोरनारे यांना निवडणुकीत पाठिंबा दिला होता. काकांनी शिंदे गटात केलेल्या पक्ष प्रवेशाबाबत मी जास्त बोलणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना विचारूनच मी पुढच्या राजकारणाची दिशा ठरविणार आहे.अभय पाटील चिगटगावकर