Marathwada Liberation Day History
उमेश काळे, छत्रपती संभाजीनगर
Marathwada Mukti Sangram Din : १५ ऑगस्ट १९४७ 'स्वतंत्र भारता' ची पहिली पहाट झाली;पण आम्ही भारतात विलिन न होता स्वतंत्र राहणार असल्याची शेखी मिरवत भारत सरकारसमोर निझामने शरणागती नाकारली. निझाम शरण येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन पोलो’ राबवले. ती तारीख होती 17 सप्टेंबर,1948...13 सप्टेंबरला पहाटेपासून सुरू झालेले हे ऑपरेशन पाच दिवस चालले आणि निझामाने आपला पराभव मान्य केला.
ब्रिटिश काळात देशात सुमारे 565 संस्थाने होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद, जुनागढ, काश्मीर वगळता अन्य संस्थाने भारतात बिनशर्त विलिन झाली; पण, या तीन संस्थानांचा विषय शिल्लक होता. तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी या संस्थानांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे दिली. जुनागढचा राजा मुस्लिम होता; परंतु प्रजा बहुसंख्य हिंदू होती. प्रजेची इच्छा भारतात रहावयाची होती. तेथे सार्वमत घेण्यात आले. यानंतर हे संस्थान भारतात विलिन झाले. काश्मीरात प्रजा मुस्लिम व राजा हिंदू होता. त्या भागात पाकिस्तानी आक्रमणानंतर राजाने भारताकडे मदत मागितली, पाकिस्तानचा पराभव झाला. काश्मीर भारतात राहिला. हैदराबादचा विषय संयमाने हाताळावा लागला. कारण हैदराबाद संस्थान हे सीमावर्ती भागात नव्हते. भौगोलिक स्थिती पाहता आताचा संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील दोन तीन तालुके, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणाचा काही भाग हैदराबादेत होता.
हैदराबाद संस्थान जैसे थे ठेवले तर ते कॅन्सरप्रमाणे राहणार, असे मत सरदार पटेलांनी व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांनी निजाम मीर उस्मान अलीसोबत चर्चेच्या फेर्या चालू ठेवल्या. निजामाने आपला विश्वासू कासीम रिजवी याला दिल्लीत चर्चेला पाठविले. तेव्हा तो सरदारांना म्हणाला, आपण सरदार असाल दिल्लीचे. हैदराबादेत आमचेच राज्य चालणार. तुम्ही बळजबरी केली तर हैदराबादेतील हिंदूंचे खरे नाही. त्यावर सरदार पटेल त्यास म्हणाले, तुम्ही आत्महत्याच करावयाची असे ठरविले तर माझा नाईलाज आहे. गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना वाटत होते की हैदाराबादेत बलप्रयोग न करता शांततेने विषय सोडवावा, पण सरदार पटेल यांनी वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर लष्कर पाचारण करण्याचा निर्णय घेतला.
लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन पोलो' या मोहिमेचा उद्देश हैदराबाद संस्थान भारतात सामील करून घेणे आणि देशद्रोही शक्ती संस्थानात प्रवेश करणार नाही, असा होता. निझामाने रझाकारी व्यवस्था (जिहादी युवक व अर्धसैनिक दलांचा गट) निर्माण करीत हिंदूंवर अत्याचार सुरू केले होते. या राजवटीच्या विरोधात जनतेचाही लढा एकीकडे सुरू होता; पण आपले सिंहासन बळकट करण्यासाठी निझामाने पाकिस्तान, पोर्तुगाल व अन्य देशांकडे मदत मागितल्यानंतर मात्र भारत सरकारपुढे हा भूभाग ताब्यात घेण्याशिवाय पर्याय नव्हता. 1948 च्या सुमारास देशात सर्वात जास्त 17 पोलोची मैदाने हैदराबादेतच होती, त्यामुळे लष्करी कारवाईला पोलोचे नाव देण्यात आले.
मेजर जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 13सप्टेंबरड १९४८ रोजी पहाटे लष्कराने हैदराबादकडे कूच केली. संभाजीनगर, सोलापूर, गुलबर्गा मार्गे जवान प्रदेश ताब्यात घेत पुढे सरकत होते. अखेरीस आपला पराभव अटळ असल्याचे लक्षात येताच निजाम मीर अली याने रेडिओवरून शरणागतीची घोषणा केली. या कारवाईत 1,373 रजाकार आणि निझामाचे 800 सैनिक मारले गेले. भारतीय लष्कराच्या 66 जवानांना वीरमरण आले, 96 जखमी झाले.
सरदार पटेलांनी लष्करी कारवाईला हिरवा झेंडा दाखविला म्हणून ठीक. अन्यथा परिस्थिती विचित्र झाली असती. पटेलांचे सहकारी के. एम. मुन्शी यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून हैदराबादेत नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी आपल्या एका पुस्तकात लिहिले आहे, ऑपरेशन पोलो झाले नसते तर हैदराबाद संस्थानातील दीड कोटी हिंदूंची हाडे आणि राख दिसली असती. थोडा जरी उशीर कारवाईला झाला असता तर दुसरे पाकिस्तान झाले असते. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल यांचे उपकार मराठवाड्याला विसरून चालणार नाही.