छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसामुळे जायकवाडी धरण यंदा तुडुंब भरले होते. मात्र, मागील महिनाभरापासून राज्यात पावसाचे प्रमाण रोडावले असून, मराठवाड्यात तब्बल ४० दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे.
कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे धरणातून सध्या दररोज तब्बल १.३७ दशलक्ष घन मीटर (दलघमी) पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. याचाच अर्थ छत्रपती संभाजीनगर शहराला आठ दिवस पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी पुरेल एवढ्या पाण्याची ऐन पावसाळ्यात दररोज अक्षरशः वाफ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
धरणांमधून सातत्याने मोठी आवक सुरू राहिल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागत होता. मात्र, यंदा मराठवाड्यात पाऊस गायब झाला असून अल निनोच्या प्रभावामुळे राज्यभरात पावसाचे प्रमाण घटले आहे. २३ ऑगस्ट रोजी नगर-नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीत अवधी २ हजार क्युसेक आवक सुरू होती, तर धरणातील जलसाठा ९५ टक्क्यांवर होता. परंतु, गेल्या १२ दिवसांपासून पाणलोट क्षेत्रासह वरच्या धरणांतून होणारी आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
१८ दिवसांत ७ टक्के पाणी कमी
जिल्ह्यात २ ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी तीव्र उष्णता जाणवत आहे. २४ ऑगस्ट रोजी धरणात ९४.२९ टक्के साठा होता. मात्र, आवक बंद आणि बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने अवघ्या १८ दिवसांत धरणातील जलसाठा तब्बल ७टक्क्यांनी घसरला आहे. दररोज धरणातून उडून जाणाऱ्या १.३७दलघमी पाण्यात शहराच्या १८ लाख लोकसंख्येची आठ दिवस तहान भागू शकते आणि ५ हजार उद्योगांना आठवडाभर पाणी पुरू शकते.
पुढील काळात पाणी कपातीचे संकट निश्चित ?
सामान्यतः उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरणातून दररोज १.१० दलघमी, तर एप्रिल-मे महिन्यांत १.८० ते २ दलघमी पाण्याची वाफ होते. यंदा मात्र सप्टेंबरमध्येच उन्हाळ्यासारखे बाष्पीभवन सुरू झाले आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वाढवले नाही, तर येणारा उन्हाळा शहरवासीयांसाठी अत्यंत बिकट ठरेल. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह उद्योगांच्या पाण्यात मोठी कपात करावी लागण्याची दाट शक्यता आतापासूनच प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.