Maratha Kranti Morcha office-bearers confronted MLA Lad held under house arrest for 18 hours
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हैदरावाद गॅझेट आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच, भाजप आ. प्रसाद लाड यांना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट फोनवरून विचारणा केली. या घटनेनंतर गुरुवारी (दि. २१) मध्यरात्री शहरात मोठा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
काही वेळातच हायकोर्ट सिग्नल परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आणि गुन्हे शाखेने गणेश उगले व योगेश शेळके या दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या दोघांना तब्बल १८ तास पोलिस आयुक्तालयात नजरकैदेत ठेवण्यात आले आणि शुक्रवारी (दि. २२) आ. लाड शहराबाहेर पडल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपो-षणानंतर शासनाने २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला. मात्र, यानुसार एकही कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष खदखदत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
त्यांची भेट घेण्यासाठी आ. प्रसाद लाड गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वी आ. लाड यांनी मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आधीच आक्रमक झाले होते. याच रागातून गणेश उगले यांनी आ. लाड यांना मोबाईलवर संपर्क साधून भेटण्याची आणि निवेदन देण्याची वेळ मागितली. मात्र, फोन केल्याच्या कारणावरूनच मोठे वादंग उठले. अख्खे पोलिस दल या एका गोष्टीमुळे कामाला लागल्याचे पहायला मिळाले.
प्रकरण चिघळल्याचे लक्षात येताच पोलिस यंत्रणा तातडीने अॅक्शन मोडवर आली. रात्रीच गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी मोठा फौजफाटा घेऊन आ. लाड मुक्कामी असलेल्या जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलकडे धाव घेतली. हॉटेल परिसरात मोठा बंदोबस्त लावल्यानंतर पोलिसांनी गणेश उगले यांची शोध- ाशोध सुरू केली. अवघ्या काही अंतरावरच उगले आणि त्यांचे सहकारी योगेश शेळके यांना गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच उचलले आणि थेट पोलिस आयुक्तालय गाठले.
सरकारची दडपशाही : शेळके
सरकारने २ सप्टेंबर रोजी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांनी समाजाला उत्तर द्यावे, या अनुषंगाने आम्ही आ. प्रसाद लाड यांना भेटायला गेलो होतो. त्यांना केवळ निवेदन द्यायचे होते. मात्र, निष्क्रिय सरकारने आमच्यावर हल्ला करण्याचा खोटा आरोप लावून आम्हाला तब्बल १८ तास नजरकैदेत डांबले. ही उघड दडपशाही आहे
समाजाचा प्रश्न विचारला : गणेश उगले
तीन वर्षांपूर्वी अंतरवली सराटीत उपोषणाच्या दरम्यान मराठा समाजाच्या माता भगिनींवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्यानंतरही मुंबईत बसून मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामाची उपमा दिली. त्या आ. प्रसाद लाड यांनी सकल मराठा समाजाची माफी मागूनच अंतरवाली सराटीत पाय ठेवावा अशी मागणी करण्यासाठी त्यांना कॉल केला होता. त्यांना भेटून निवेदनही देणार होतो. मात्र, आमच्यावर हल्ल्याचा आरोप करण्यात आला. मी कुठल्याही प्रकारचा हल्ला करणार नव्हतो. लोकशाही मागनि विचारणा करणेही आज गुन्हा आहे का? समाजाच्या झालेल्या फसवणुकीबद्दलही जाब विचारणार होतो.