छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: आम्ही तिसरी आघाडी वगैरे काही करणार नाही. मात्र निवडणूक लढवायची ठरवली तर सगळे उमेदवार अपक्ष असतील आणि नाही ठरले तर पाडापाडी करणार, असे सूचक विधान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात केले आहे. रिपाइंचे नेते राजरत्न आंबेडकर यांच्या 'आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जरांगे' असतील या वक्तव्याला, उद्देशून ते बोलत होते.
जरांगे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालय गॅलेक्सी येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी (दि.२) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना विरोधक मानतच नाही, त्यामुळे त्यांच्यावर वो लणार नाही. तसेच माझी तब्येत ठीक आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता सुटी घेऊन अंतरवालीला दसरा मेळाव्याचे नियोजन करायला जाणार आहे. हा अठरापगड जातींच्या लोकांचा उत्सव असून मी भक्त आहे आणि तिथे येणारे भक्त असणार आहेत, असे जरांगे म्हणाले. गडावर जोरदार तयारी सुरू असून ५२ हजार स्वयंसेवक आहेत.
त्यांच्यांकडून गडावर जेवण, वैद्यकीय सुविधा, पाण्याची सुविधा, महिलांसाठी शौचालय अशा सगळ्या सुविधा करण्याची तयारी सुरू आहे. तसेच मराठा बांधवांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. आपला मेळावा असला पाहिजे ती इच्छा आता पूर्ण होणार आहे, असेही जरांगे म्हणाले.
मराठा नेत्यांनो, तुमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा. आरक्षण देणार असतील तर मी राजकारणाचा एक शब्दही काढणार नाही. मला महायुती व महा आघाडीशी देणे-घेणे नाही. भाजप नेते आरक्षण देत नसतील तर समाजाचे वाटोळे करणाऱ्यांसोबत राहू नका, असे जरांगे म्हणाले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्हाला जे काही साम- दाम-दंड- भेद वापरायचे ते वापरा मात्र मराठ्यांच्या नादाला लागू नका, असे ते म्हणाले.
तुम्ही कितीही तयारी करा, मात्र आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून आरक्षण दिले नाही तर आगामी निवडणुकीत मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी सत्ताधारी व विरोधक यांना दिला आहे. तसेच मराठा, मुस्लिम, धनगर आणि बारा बलुतेदार समाजाचेही दुःख एकच आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या मनाला समजून घ्यावे, असेही ते म्हणाले.