छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : सर्वांनी आशा धरा. 24 डिसेंबरपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार आहे. कुणीही आत्महत्या करू नका, असे भावनिक आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी (दि. 12) केले. सरकारशी बोलणे सुरू आहे. जे सत्तर वर्षे मिळत नव्हते, ते प्रमाणपत्रही सध्या मिळत आहे. त्यामुळे धीर धरा, असे ते म्हणाले. दरम्यान, अकरा दिवसांच्या उपचारानंतर मनोज जरांगे-पाटील हे आज अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. अंतरवाली येथील महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले.
ते म्हणाले, आज आणि उद्या आराम करून पुन्हा दौर्यावर जाणार आहे. समाजबांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे. सरकारने आरक्षण नाही दिले तर राज्यभरात शांततेत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रुग्णालयात सरकारचे शिष्टमंडळ येईल आणि टाईमबाँड देईल, असे सांगितले होते. मात्र ते आले नाही. आता अंतरवाली सराटीत येऊन दौर्यापूर्वी त्यांनी टाईमबाँड दिला नाही तर भूमिका स्पष्ट करू, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
मी गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून चौंडीला गेलो होतो. त्यांनी साथ दिली किंवा सोबत नाही दिली तरी त्यांच्या सोबतच राहू. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी मी धनगर आरक्षणासाठी लढणार असल्याचे जरांगे-पाटील म्हणाले. ओबीसी नेत्यांनी हट्टीपण करून वातावरण बिघडवू नये, असे सर्वांना वाटते, असेही त्यांनी सांगितले.