Mahavitaran's claim of automatic reading is false!
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मीटर रीडिंग ऑटोमॅटिक होणार आणि ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार, असा मोठा दावा महावितरणने केला होता. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेले हे स्मार्ट मीटर आजही महावितरणच्या मुख्य सिस्टीमशी कनेक्टच झाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २० हजारांहून अधिक मीटर आजही ऑफलाईन आहेत. शहरातील अनेक भागांत आजही जुन्याच (पारंपरिक) पद्धतीने मीटर रीडिंग घेणे सुरू असून, महावितरणचा ऑटोमॅटिक रीडिंगचा दावा सपशेल फोल ठरला आहे.
स्मार्ट मीटरला पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांचा तीव्र विरोध आहे. असे असतानाही, हे मीटर ग्राहकांसाठी कसे लाभदायक आहेत हे महावितरणकडून वारंवार बिंबवले जात होते. सध्या मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीला एका मीटरमागे ६ ते ७ रुपये मोजावे लागतात. स्मार्ट मीटरमुळे या पैशांची बचत होईल आणि तो निधी ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी वापरला जाईल, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात हा दावा हवेतच विरला आहे. आजघडीला छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतील तब्बल २० हजार ७४१ स्मार्ट मीटरचे रीडिंग अजूनही पारंपरिक पद्धतीनेच, म्हणजेच कर्मचाऱ्यांमार्फत (रीडर) केले जात आहे.
अनेक भागांत स्मार्ट मीटर लावूनही ते सिस्टीमशी जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे जुन्याच पद्धतीने रीडिंग सुरू आहे. एकीकडे स्मार्ट मीटरचा खर्च आणि दुसरीकडे मीटर रीडिंगसाठी प्रतिमीटर ६ ते ७ रुपयांचा खर्च; मग हा दुहेरी आर्थिक भुर्दंड आम्ही का सहन करायचा? असा संतप्त सवाल आता वीज ग्राहकांकडून विचारला जात आहे.
४ लाखांपेक्षा जास्त स्मार्ट मीटर बसवले
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत सुमारे ४ लाख १० हजार २७१ स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
शहरात : १,१३, ८७४ मीटर
ग्रामीण भागात : १, ९४,७०० मीटर
यापैकी १३ मार्चपर्यंत २ लाख ६४ हजार ७५४ स्मार्ट मीटर्सची रीडिंग ऑटोमॅटिक होईल, अशी महावितरणला अपेक्षा होती. परंतु यातील २० हजारांपेक्षाही जास्त मीटर आजही ऑटोमॅटिक रीडिंग देण्यास तयार नसल्याने, नाईलाजाने त्यांची रीडिंग मीटर रीडरच्या माध्यमातूनच घ्यावी लागत आहे.
अनेक स्मार्ट मीटर मुख्य सिस्टीमशी कनेक्ट झाले नसल्याने ही अडचण येत आहे. असे असले तरी ते सिस्टीमशी जोडण्याचे काम सध्या अत्यंत वेगात सुरू असून, लवकरच या सर्व मीटर्सची रीडिंग ऑटोमॅटिक पद्धतीने सुरू होईल.पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता,