Dattatray Bharnne
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, आतापर्यंत शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. दिवाळीच्या आधी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कुठलीही मदत राहणार नाही, असे अश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिले. आज (दि. २४) छत्रपती संभाजीनगर येथे ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. मराठवाड्यात महापुराने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी मदतीसाठी नुकसानीचे फोटो पाठवणे गरजेचे नाही. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी स्वतः बांधावर जाऊन पंचनामे करतील, असेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यात २ लाख ५४ एकर शेतीचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान नांदेडमध्ये झाले आहे. पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाणार आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळेल, असे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान आहे आहे, त्या ठिकाणी कर्ज वसुली थांबवा, अशा सुचना राज्य सरकार बँकांना देणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.