Long queues of vehicles at petrol pumps
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात बुधवारी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुपारनंतर अर्धेअधिक पेट्रोल पंप ड्राय झाले. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवांमुळे गर्दी होत असल्याचे चित्र आहे. मध्यपूर्व देशांमधील युद्धामुळे निर्माण झालेली इंधन तुटवड्याची स्थिती आणखी चिघळत असल्याचे चित्र आहे.
याचा परिणाम संभाजीनगर शहर जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावरही दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेल साठा संपल्याने शहरातील काही पेट्रोल पंप मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी बंद होते. मात्र स्टॉक आल्याने पंप पुन्हा सुरळीत सुरू झाले.
दरम्यान, आता पेट्रोल संपणार या अफवेमुळे वाहनधारकांनी शहर जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे. पंपांवर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. इंधनाचे वाढते दर आणि होणारा तुटवटा यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये इंधनचे दर आणखी बाढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मिळेल तितके इंधन भरून घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढला आहे. परिणामी बहुतेक पंप काही तासांतच ड्राय होत आहेत.
पंपांवर स्टॉक फलक लावा
पेट्रोल-डिझेल स्टॉक संपल्यानंतर पुढील स्टॉक कधी उपलब्ध होणार याचा फलक पंपावर लावण्याचे आदेश बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इंधन कंपन्यांना दिले आहेत. यासोबतच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पंपांची दैनंदिन मागणी, पुरवठा आणि शिल्लक साठा, याचा अहवाल दररोज सायंकाळी ५ वाजेपूर्वी जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर करण्याबाबतही जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कंपन्यांना आदेशित केले आहे.
नागरिकांनी पॅनिक होऊ नये
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे. मात्र मागणीपेक्षा अधिकचे इंधन भरून घेतले जात असल्याने पंप लवकर ड्राय होत आहेत. वाहनधारकांनी अतिरिक्त साठा करून ठेवू नये. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पेट्रोल-डिझेलपासून अपघात होऊ शकतात. याशिवाय साठा लवकर संपतो आणि इंधन नसल्याची अफवा पसरते. जितकी गरज आहे तितकेच इंधन भरावे, असे आवाहन पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केले आहे.
डिझेलसाठी पीक पिरियड
जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे सुरु आहेत. ट्रॅक्टर व इतर यंत्रांसाठी डिझेलचा वापर वाढला आहे. शिवाय उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ट्रॅक्टर, ट्रकद्वारे ही वाहतूक शेत ते कारखान्यापर्यंत होते. या वाहनांमुळे डिझेलची मागणी वाढते. त्यामुळे पंपावरील साठा लवकर संपतो. परिणामी दुसऱ्या पंपावर गर्दी होते. आणि माल मिळत नसल्याचा समज वाहनधारकांचा होत आहे.