पैठण : जायकवाडी धरणात २० टक्के पाणीसाठा झाल्यावर गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. सोडलेल्या पाण्यामुळे शेतकरी, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी सांगितले.
दरम्यान,. सोमवारी (दि.३) रात्री आठ वाजेपर्यंत जायकवाडी धरणातील वरील धरणांतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याची आवक २२ हजार ३९० क्यूसेक सुरू आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा १९०७.३७८ दलघमी आहे. धरणाच्या पाण्याची टक्केवारी ८७.८६ नोंद नियंत्रण कक्षात झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ शासकीय स्तरावर उपाययोजना करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती निवारण समितीची बैठक पैठण येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि.३) झाली.
नैसर्गिक आपत्ती काळात संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पूर्वक कार्य करावे, अशा सूचना नीलम बाफना यांनी दिल्या. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने कुठल्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे शेतकरी, नागरिक यांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात यावी आदी सूचना उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.
शासकीय स्तरावर करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. पाणी विसर्ग करण्यापूर्वी अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात येईल, असे धरण अभियंता श्रद्धा निंबाळकर यांनी सांगितले.