छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी सरकारला आतापर्यंत दोन वेळा मुदत दिली होती. मात्र, सरकारने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. आता ही महिनाभराची मुदतही शनिवारी (दि.13) संपली. सरकारकडे आता फक्त आजची रात्र आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा 20 जुलैपासून पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू केले जाईल. तसेच त्याच दिवशी बैठक घेऊन मुंबईला जाण्याची तारीख ठरविली जाईल. आता आम्ही ठरवू 288 पाडायचे की उभे करायचे, असा कडक इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.ते मराठा आरक्षण संवाद रॅलीच्या समारोपप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.
सरकारने मराठ्यांचा आता अंत पाहू नये, असा इशारा देत 15 जुलैपासून ते 17 जुलैपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळे या दिवसात आपण फक्त सरकारच्या निर्णयाची वाट पाहायची. मात्र, 18 आणि 19 जुलैला जर सरकारचा काही निर्णय आला नाही तर 20 जुलैपासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा कठोर उपोषण सुरू करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला.
आतापर्यंत सरकार आपल्याला 54 लाख नोंद म्हणत होते, पण आता सरकाने आपल्याला अधिकृत आकडा दिला आहे. राज्यात 57 लाख नोंदी सापडल्या असून एका नोंदीवर किमान तिघांना कुणबी प्रमाणपत्र निघते. या आकड्यानुसार पाहिले तरी राज्यात सुमारे दीड कोटी मराठे आताच कुणबी झाल्याचेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, मला गावठी म्हणणाऱ्यांना मी काय करू शकतो, हे दाखवून दिले, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
आपल्या आंदोलनाला जातीवादाचा डाग लावला, असे म्हणत जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन यांना नाव घेऊन तर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांना नाव न घेतला कडक शब्दात इशारा दिला. माझ्या नादी लागू नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले. महाजन यांच्या मतदारसंघात 1 लाख 36 हजार कुणबी आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनाही पाहून घेऊ, असे ते म्हणाले.