छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वाधिक उंचीचे शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, या शिखराचा बेस कॅम्प गाठणे खुप कठीण. अशा वेळी विशेष म्हणजे शहरातील सत्तरीच्या जवळ पोहोचलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मा तापडिया यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार केली.
ड्रीम अचीव्हर्स ग्रुपच्या शिबिराच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यातील १४ ट्रेकर्सनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पची चढाई यशस्वी केली. समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर असलेल्या या कॅम्पची चढ़ाई त्यांनी केली आहे. एव्हरेस्टवीर रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ही चढाई १८ दिवसांत पूर्ण केली.
अत्यंत खडतर अशा या मोहिमेसाठी चार महिन्यांपासून सराव सुरू झाला होता. शहरातून मिलिंद सांगवीकर, पद्मा तापडिया, शिवाजी पाटील, शिरीष तांबे, रवींद्र रहाटगावकर, निरुपमा नागोरी, जितेंद्र आहेर, अॅड. नरेश गाडेकर, डॉ. रैना शेख, आर्किटेक्ट तरन्नुम कादरी, स्नेहल जाजू, किरण भट्टड, भक्ती भोज, सोनाली इंगळे यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे ५० ते ६० वयोगटातील ८ सदस्य, तर ३० ते ४० वयोगटातील ट्रेकर्सचा समावेश होता.
एव्हरेस्ट शिखराचा बेस कॅम्प गाठणे सोपे नव्हते मात्र इच्छा होती. त्यासाठी आधी चार महिने मेहनत घेतली. पौर्णिमेची रात्र असली की एव्हरेस्टवीर रफिक शेख यांच्या मार्गदर्शनात रात्रभर डोंगर चढण्याची उतरण्याचा सराव केला. शरीरालाही त्याअनुषंगाने तयार केले. आहारात जास्त उर्जा मिळेल अशा पदार्थांचा समावेश केला.
– पद्मा तापडिया, सामाजिक कार्यकर्त्या