छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून नेहमी खुन्नस देणाऱ्या सासरा अन् चुलत साल्याने जावयाला भररस्त्यात चाकूने भोसकले होते. १४ जुलैला रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास इंदिरानगर, गारखेडा भागात ही घटना घडली होती. दरम्यान, जखमी जावयाचा २५ जुलैला दुपारी २ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Honour Killing in Chh. Sambhajinagar)
अमित मुरलीधर साळुंके, असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गीताराम भास्करराव कीर्तिशाही, अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही (दोघे रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात आता खुनाचे कलम वाढविले जाणार आहे.
अधिक माहितीनुसार, मुरलीधर साळुंखे हे फिर्यादी आहेत. ते पत्नी, दोन मुले आणि सुनेसह इंदिरानगर येथे राहतात. २ मे २०२४ रोजी त्यांचा मोठा मुलगा अमित यांनी गीताराम कीर्तिशाही यांच्या मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. हे लग्न पार पडल्यानंतर गीताराम कीर्तिशाही व अप्पासाहेब कीर्तिशाही यांनी मुरलीधर यांची भेट घेऊन अमित आणि त्याच्या पत्नीला इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका. जर ते येथे दिसले तर त्यांच्या जीवाचे बरेवाईट करू, अशी धमकी दिली होती. तेव्हापासून ते खुन्नस देत होते.
दरम्यान, साळुंके कुटुंबीयांनी १४ जुलै रोजी रात्री १०.१५ वाजता जेवण केले. त्यानंतर अमित हा पायी फिरण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर १०.४५ वाजता कीर्तिशाही चुलता-पुतण्याने अमितला गाठले. आमच्या मुलीसोबत लग्न करून उलट येथेच आमच्यासमोरच राहतो का, असे धमकावून विचारत त्यांनी अमितवर चाकूहल्ला केला होता. त्याच्या पोटात, मांडीवर आणि हातावर चाकूने वार केले होते. गंभीर जमखी अमितवर घाटीत ११ दिवस उपचार सुरू होते. मात्र २५ जुलैला त्याने अखेरचा श्वास घेतला.