Hearing underway at the Board regarding the copying case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणात दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची सुनावणीची प्रक्रिया सोमवार दि. २३ मार्चपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी विभागातील पाच जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी सुनावणीसाठी हजेरी लावली. या विद्यार्थ्यांनी कॉपी प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमधील दहावी बारावीच्या परीक्षा १८ मार्च रोजी संपल्या. याच दरम्यान उत्तरपत्रिका तपासणीसह कॉपी प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांच्या सुनवाईची प्रक्रियेवरही मंडळाकडून तयारी सुरू होती.
कॉपी प्रकरणात ठपका ठेवलेल्या विद्यार्थ्यांची सुनावणी २३ मार्चपासून सुरू झाली. राज्य मंडळाच्या विभागीय कार्यालयात ही सुनावणी घेण्यात येत आहे. अधिकास्यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ व २४ मार्च रोजी बारावी तर दहावीतील विद्यार्थ्यांची सुनावणी २५ व २७ मार्च रोजी घेतली जाणार आहे. शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात ही सुनावणी घेतली जात आहे. मंडळाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीसमोर हे विद्यार्थी आपली बाजू मांडत आहेत.
विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व हिंगोली जिल्हे आहेत. कॉपीप्रकरणी विद्यार्थ्यांना उपस्थित राहून आपली बाजू मांडायची संधी दिली जाते. सुनावणी घेण्यासाठी विषय तज्ञ व मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी असतात. विद्यार्थ्याने केलेला गुन्हा लक्षात घेत कारवाई निश्चित केली जाते. विद्यार्थ्याच्या दोषानुसार मंडळाची कारवाईची नियमावली आहे.