पाळीव श्वान रेल्वेखाली येईल या भीतीने त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या एका श्वानप्रेमीला श्वानासह आपलाही जीव गमवावा लागला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.2) सायंकाळी संग्रामनगर उड्डाण पुलाखाली घडली. भाऊसाहेब लांडगे (रा. कासलीवालपुरम ) असे मृताचे नाव आहे.
लांडगे हे शुक्रवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे आपल्या श्वानाला घेऊन संग्रामनगर उड्डाणपुला खाली आले होते. याच दरम्यान चिकलठाणाकडून रेल्वे येत होती. लांडगे यांनी श्वानासह रूळ ओलांडत असताना श्वान पाठीमागे राहिला. तो रेल्वेखाली येईल या भीतीने ते घाई गडबडीत मागे वळले. याच दरम्यान तेथून जाणाऱ्या रेल्वेचा मार त्यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान रेल्वेच्या धडकेने त्यांचा श्वान जागेवरच मृत झाला. आणि काही मिनिटांतच लांडगे यांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील बघ्याची एकच गर्दी जमली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.