Gangapur Electrocution in water; two biological brothers lose their lives
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातील विद्युत प्रवाह मच्छीमारांच्या जीवावर बेतत असतानाही वीज वितरण यंत्रणा अद्याप जागी झालेली नसल्याचा संतप्त आरोप होत आहे. जुने कायगाव येथे ६ ऑगस्ट रोजी मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत सावखेडा येथे दोन सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने गोदावरीकाठच्या विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सलग घटनांमुळे महावितरण विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सावखेडा शिवारातील महानुभाव आश्रमाजवळ रविवारी (दि. १६) सकाळी साडेसहाच्या सुमारास कैलास नंदू पवार (४२) आणि ज्ञानेश्वर नंदू पवार (३८, दोघेही रा. सावखेडा) है मासेमारीचे जाळे काढण्यासाठी गोदावरीच्या पुराच्या पाण्यात उतरले होते. त्याचवेळी अचानक दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. सावखेडा घटनेप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोहेकों मनोज घोडके तपास करीत आहेत.
दरम्यान, पुराच्या पाण्यात वीजप्रवाह कसा उत्तरला? नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असताना नदीपात्र आणि लगतच्या परिसरातील विद्युत व्यवस्थेची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरते. विद्युत वाहिन्या, खांब किंवा इतर यंत्रणेत बिघाड झाल्यास पुराच्या पाण्यात वीजप्रवाह उतरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पूरस्थिती लक्षात घेऊन थोकादायक भागातील वीजपुरवठा तातडीने बंद करणे आवश्यक असते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गोदावरीला पूर आलेला असताना ६ ऑगस्ट रोजी जुने कायगाव येथे सुभाष रंगिलदास बिरुटे (६०) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर नदीकाठच्या विद्युत वाहिन्या, खांब आणि वीजपुरवठा व्यवस्थेची तातडीने तपासणी करून धोकादायक ठिकाणी वीजपुरवठा बंद करणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतरही सावखेड्यात दोन भावांचा बळी गेल्याने कायगावच्या घटनेतून वीज विभागाने नेमका कोणता धडा घेतला ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत-
उपाययोजनांची गरज
नदीपात्रातील विद्युत सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, संबंधित वाहिन्यांची तपासणी झाली होती का, धोकादायक भागातील वीजपुरवठा का खंडित करण्यात आला नाही, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.