'File a case against the contractor responsible for the child's death' Guardian Minister's orders to MJP officials
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देवळाई परिसरात जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यात बुडून तीन वर्षिय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर शुक्रवारी (दि.५) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी परिसराला भेट देत पाहणी केली. त्यानंतर बालकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच शहरात जलवाहिन्यांसाठी खोदलेल्या सर्व खड्यांची यादी करून ते तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, माजी महापौर नंदकुमार घोडले, शिवसेनेचे पदाधिकारी हकिम पटेल, सलीम पटेल, नईम पटेल, शिवाजी हिवाळे उपस्थित होते. नवीन पाणीपुरवठा योजनेतून संपूर्ण शहरात मुख्य जलवाहिन्यांसह अंतर्गत पाणीप रवठ्याच्या व पाणी वितरणाच्या वाहिन्या टाकणे सुरू आहे.
या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपीने) कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी नियुक्त केली आहे. या कंपनीने जलवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण शहरात खड्डे खोदले आहेत. असेच खड्डे दे वळाईतील अहमदनगर भागातही खोदून ठेवले आहेत. या खड्यात पावसाचे पाणी साचले आहेत. त्यात बुडून बुधवारी इश्वर संदीप भास्कर या ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तो खड्डा अजूनही जैसे थेच आहे. त्यामुळे नागरिकांतून एमजेपी, महापालिका आणि कंत्राटदार एजन्सीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी पालकमंत्री शिरसाट यांनी घटनास्थळाची पाहणी केली. भले मोठे खड्डे पाहून त्यांनी एमजेपीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. जलवाहिन्यांसाठी खड्डे तर खोदले. परंतु जलवाहिन्या टाकल्यानंतर खड्डे बुजविले का नाहीत, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. तर काम होताच खड्डे बुजवण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत, असे एमजेपीच्या उपअभियंता पूजा जाधव यांनी सांगितले.
नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी येथील एमबीआरमधून एक १३०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी हसूलच्या दिशेने जात आहे. देवळाईतील गट नंबर ७८ मधील अहमदनगर भागातून ही जलवाहिनी टाकली जात आहे. त्यासाठी दीड महिन्यापूर्वी हा १५ फुटांचा खड्डा खोदला आहे.
कंत्राटादर मनामनीपणे काम करीत आहे. तकार केल्यानंतर तुम्हाला जेलमध्ये जायचे आहे का? असा प्रश्न केला जातो. आमच्या घरासोमर खड्डे खोदले, आम्ही काय करायचे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.