मोबीन खान
वैजापूर : एक घाव दोन तुकडे, असे म्हणतात, पण एक गाव, दोन तुकडे अशी तालुक्यातील गोदाकाठावरील जवळपास पंधरा गावांची अवस्था झाली आहे. बाजारपेठ, रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांमुळे ही गावे वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्यात विभागली गेली आहे. त्यामुळे आधे इधर, आधे उधर, अशी येथील ग्रामस्थांची अवस्था आहे. अशा विचित्र परिस्थितीमुळे येथील गावकऱ्यांना विशेष करून गोदावरी नदीला पूर आल्यानंतर अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वैजापूर तालुक्यात चेंडूफळ, शनी देवगाव, बाजाठाण, हमरापूर, अव्वलगाव, नागमठाण, डाग पिंपळगाव, भालगाव, वांजरगाव, पुरणगाव, सावखेडगंगा, नांदुरढोक, लाख बाबतारा आणि डोणगाव ही पंधरा गावे गोदावरी नदीकाठावर वसली आहेत. या गावातील लोकांना जर वैजापूर शहरात यायचे ठरले तर काही गावांना २७ ते ४० किमीचे अंतर पडते. तर याच लोकांना श्रीरामपूरला जायचे ठरले तर केवळ १५ ते २० किमी अंतर जावे लागते.
विशेष म्हणजे वैजापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर गाव असल्याने येथील पुढारीसुद्धा केवळ निवडणुकीच्या वेळेस मत मागण्यासाठी जातात. एकदा निवडून आले की पुढारी पाच वर्षांत एकदाही गोदाकाठावरील गावांत फिरकत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. काही गावांची तर अशी अवस्था आहे की, त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. गोदाकाठा वरून किंवा नदीतील पाण्यातून ग्रामस्थांची बारा महिन्यांतून सहा महिने वाट पाण्यातून काढावी लागते. ज्यावेळी ही गाव वसली, तेव्हापासून या गावामागच्या समस्यांचे ग्रहण सुटले नसल्याचे चित्र आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी श्रीरामपूर तालुक्याला पसंती आहे. नाइलाजाने आम्हाला केवळ महसुली कामासाठीच वैजापूरशी संपर्क पडतो. असे बाजाठाणचे माजी सरपंच सुभाष भराडे यांनी सांगितले.
कमलपूर के.टी. वेअर पूल पाण्यात
वैजापूर, गंगापूर आणि नेवासा-श्रीरामपूरला जाण्यासाठी गोदावरी नदीत कमलपूर के.टी. वेअर जुने पूल आहे. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने गोदावरी नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्यात जातो. त्यामुळे आठ-आठ दिवस हे मार्ग बंद पडतो. त्यामुळे येथील पुलाची उंची वाढविण्यात यावी यासाठी येथील ग्रामस्थ तब्बल १० ते १२ वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत.