Enraged Shiv Sena workers marched to Minister Shirsat's bungalow, demanding that the alliance be broken.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपावरून शिवसेनेतच घमासान सुरू झाले आहे. महायुतीत शिवसेनेला अवघ्या ३७जागा मिळत असल्याने सोमवारी (दि. २९) आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर मोर्चा काढत युती तोडण्याची मागणी केली.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये काही दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत नऊ बैठका झाल्या. त्यानंतर सोमवारी दुपारी अचानक शिवसेनेतच महायुती घमासान सुरू झाले. शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपकडून मंत्री अतुल सावे यांच्यात चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाच्या प्रचार कार्यालयात येत जागा वाटपात शिवसेनेला कमी जागा मिळाल्याची खंत व्यक्त केली.
तसेच कार्यकर्त्यांना अॅडजेस्ट करण्यासाठी स्वतः निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचे सांगितले. काही वेळात आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही जागा वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर युती तोडा, अशी मागणी केली. यानंतर काही वेळाने शिवाजीनगर, बाळकृष्णनगरसह गारखेडा भागातील शेकडो शिवसैनिक जंजाळ यांच्या समर्थनार्थ शिव-ाजीनगर येथे जमले.
त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत युती तोडण्याची मागणी केली. दिवसभर वातावरण तापल्यानंतर रात्री उशिरा हे शिवसैनिक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्यावर पोहोचले. त्यांनी जोरदार घो-पणाबाजी करत युती तोडण्याची मागणी केली. रात्री १० वाजेपर्यंत हा जमाव मंत्री शिरसाट यांच्या बंगल्यासमोर ठाण मांडून होता, त्यानंतर शिरसाट यांनी शिवसैनिकांना सामोरे जात महायुतीत जागा वाटप करताना शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही, असे नमूद केले.
महिला आघाडीची प्रचार कार्यालयात घोषणाबाजी
महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शारदा घुले याही शेकडो कार्यकर्त्यांसह दुपारी मध्यवर्ती कार्यालयात पोहोचल्या. या कार्यकत्यांनी लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. तिकीट मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही प्रचंड मेहनत घेतली, पण आता आमची वेळ आली तेव्हा आमच्या जागा भाजपला सोडून देत आहेत, हा आमच्यावर अन्याय आहे, अशी कैफियतही या महिलांनी यावेळी मांडली.
डोळ्यात अश्रू घेऊन बाहेर पडले
मध्यवर्ती प्रचार कार्यालयात प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्यानंतर जंजाळ यांनी तिथे असलेले आमदार प्रदीप जैस्वाल यांची खोलीत जाऊन भेट घेतली, दोघांमध्ये थोडा वेळ चर्चा झाल्यावर जंजाळ तेथून बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही जंजाळ यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे नंतर सांगितले,
जंजाळ यांची निवडणूक रिंगणातून माघार
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. महायुतीत पक्षाला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मी स्वतः निवडणुकीतून माघार घेत आहे. माझ्या जागेवर कार्यकर्त्याला उभे करणार आहे, असे जंजाळ यांनी सांगितले.