Dr. Mohan Bhagwat: If you want to eliminate caste from social interactions, then remove it from your mind
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जात व्यवहारातून घालवायची असेल तर आधी मनातून गेली पाहिजे. पूर्वी व्यवसाय आणि कामानुसार जात तयार झाली. नंतर ती समाजाला चिकटली. नंतर जातीभेद सुरू झाला.
जातीभेद संपवण्यासाठी जात न पाहण्याची मनाला सवय करावी लागेल. तरच जातीभेद संपुष्टात येईल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित समाजातील प्रबुद्ध नागरिकांसोबत संवाद व्हावा यासाठी प्रमुख जन संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्रांत संघचालक अनिल भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विजय राठी यांनी प्रास्ताविक केले. अहिल्याताई धायगुडे व छत्रसाल पांडव यांनी वैयक्तिक गीत गायले. केतकी जोशी यांच्या आवाजात कल्याण मंत्राद्वारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले, संघ हा व्यक्ती निर्माणाचे काम करतो, याशिवाय काहीही करत नाही. संघ प्रतिक्रियेतून तयार झालेले संघटन नाही. संघाची कोणासोबत स्पर्धा देखील नाही, संघाला स्वतः मोठे व्हायचे नाही. संघाला समाजाचे संघटन करायचे आहे. त्यामुळे संघ समजून घ्यायचा असेल तर संघाच्या शाखेत आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.