Discharge from the eight gates of Jayakwadi Dam
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील जायकवाडी धरणात मागील काही दिवसांत वरील धरणांतून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. मराठवाड्यातील शेतीसिंचनासह औद्योगिक वसाहतीचा पाणीप्रश्न मिटला असून, शुक्रवारी (दि.७) सायंकाळी धरणातील पाण्याची टक्केवारी ९३.५९ झाली आहे.
गुरुवारी सायंकाळी पाण्याची आवक काही प्रमाणावर कमी झाल्यामुळे धरणाचे उघडलेले १८ दरवाजांपैकी १० दरवाजे बंद करण्याचा निर्णय धरण नियंत्रण विभागाने घेतला. जायकवाडी धरणाचे बुधवारी सायंकाळी २७ दरवाजांपैकी १८ दरवाजांतून गोदावरी नदीत प्रथम १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. वरील भागातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येत होती, त्यामुळे गोदावरीत सोडलेला पाण्याचा विस २८ हजार क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला होता.
यासह डावा कालवा ८००, उजवा ११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग दोन्ही कालव्यातून व माजलगाव धरणासाठी सुरू आहे. सद्यस्थितीत धरणाचे ८ दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावरी नदीत ४ हजार ३२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यापुढे जायकवाडी धरणात ९३ टक्के पाणीसाठा कायम ठेवून वरील धरणांतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याची आवकसंदर्भात परिस्थिती लक्षात घेऊन विसर्ग कमी अथवा वाढविण्याची नियोजन असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, शनिवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार विलास भुमरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे विविध अधिकारी यांच्या हस्ते जल पूजन शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.