Devagiri Fort again engulfed in fire, causing major damage to rare plants and wildlife
खुलताबाद / दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा ऐतिहासिक वारसा लाभलेला देवगिरी किल्ला बुधवारी (दि.११) सकाळी आगीच्या विळख्यात सापडला. किल्ल्याच्या वरच्या भागात सुकलेले गवत व काटेरी झुडपे पेटल्याने मोठा परिसर जळाला. या आगीत किल्ल्याच्या परिसरातील दुर्मिळ वनस्पती, झाडे, तसेच लहान पक्षी आणि प्राण्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहा वाजेच्या किल्ल्याच्या वरच्या भागात दुर्गा तोफ, बारादरी आणि गणपती मंदिर परिसरात अचानक आग लागली. सुरुवातीला ही आग सुकलेल्या गवतामधून वेगाने पसरली आणि काही वेळातच मोठ्या भागाला वेढा घातला. आगीमुळे किल्ला परिसरातील गवत, झाडे आणि झुडपे पूर्णपणे जळून खाक झाली.
मागील काही वर्षांत घडलेल्या घटनांचा विचार करून पुरातत्व विभागाने यंदा साडेसात हॉर्सपॉवरच्या कॅनव्हास पंपासह सुमारे १००० फूट लांबीची पाईपलाईन बसवली आहे. संत जनार्दन स्वामी गुहेजवळील पाण्याची टाकी, खंदक, सरस्वती विहीर आणि कचेरी विहीर येथून पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र पाण्याचा मारा मर्यादित अंतरापर्यंतच पोहोचत असल्याने काही वेळाने पुन्हा आग भडकली आणि वरचा मोठा परिसर जळून गेला. आग विझवण्यासाठी किल्ल्यातील सहायक संरक्षक संजय रोहनकर, रवींद्र घाटे, सीताराम धनाईत, संजय घुसळे, योगेश जाधव, संतोष जाधव, हमीद शेख, अफरोज सय्यद आणि किशोर बोडखे यांनी प्रयत्न केले. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने वरचा परिसर पूर्णतः जळून खाक झाला. दरवर्षी आगीच्या घटना या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दरवर्षी लागणाऱ्या अशा आगीमुळे लहान पक्षी, मोर, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्यजीवांचा जीव धोक्यात येतो. तसेच किल्ल्याच्या परिसरातील नैसर्गिक परिसंस्थेचे मोठे नुकसान होते.
उपाययोजनांची गरज
इतिहासाचा अमूल्य वारसा असलेल्या देवगिरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी आग प्रतिबंधक उपाययोजना, गवताची नियमित साफसफाई, अग्रिशमन यंत्रणा आणि सतत देखरेख व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले.
या घटनेच्या वेळी किल्ल्यावर आलेल्या सुमारे १५० पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरवर्षी आग मार्च, एप्रिल महिन्यात सुक्या गवतामुळे दरवर्षी किल्ला परिसरात आगीच्या घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
दरवर्षी लागणाऱ्या आगीमुळे किल्ल्याचा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजल्यापासून पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. त्यामुळे देश-विदेशांतून आलेल्या अनेक पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावे लागले.
पुरेशी यंत्रणा नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट
विशेष म्हणजे, मागील वर्षी बारादरी परिसरात लागलेली आग यंदा रोखण्यात यश आले. मात्र किल्ल्याच्या आत आग लागल्यास ती विझवण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. किल्ल्याच्या उंच आणि अरुंद मार्गामुळे अग्रिशमन दलाची वाहने आतपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण होते.