वरठाण, पुढारी वृत्तसेवा : सततची नापीक व डोक्यावर वाढलेला कर्जाचा भार, घरचा प्रपंच कसा चालवायचा या विवंचनेतून एका कर्जबाजारी शेतकऱ्याने ८ एप्रिलरोजी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान जळगाव येथे शुक्रवारी (दि.१) रात्री मृत्यू झाला. सुकदेव महारु वाघ - महाजन (वय ६५, रा. निभोरा, ता. सोयगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत शेतकरी सुकदेव वाघ यांच्याकडे तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती. परंतु जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशी पूर्णपणे वाया गेले. खर्च देखील निघाला नाही. त्यातच रब्बी हंगामात ज्वारी पिकाचा पेरा केला. परंतु पाण्याअभावी हे पीक हातातून गेले. त्यामुळे ६ लाखांचे कर्ज कसे फिटणार ही चिंता त्यांना सतावत होती.
या विवंचनेत त्यांनी दि. ८ एप्रिलरोजी शेतात जाऊन विष प्राशन केले होते. नातू जेवणाचा डबा घेऊन गेले असता त्याला आजोबा बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांना तत्काळ पाचोरा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. परंतु , उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, सोयगाव तालुक्यात मागील १५ महिन्यांत जवळपास १५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आपले जीवन संपविल्याच्या घटना घडल्या आहेत.