City to Receive Water from New Scheme by End of May!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत आता अंतिम टप्प्यातील कामांना वेग देण्यात आला असून, मेअखेरपर्यंत शहराला वाढीव पाणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणीप-रवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सध्या वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेअंतर्गत सुमारे २७४० कोटी रुपयांच्या निधीतून ही योजना राबवली जात आहे. योजनेचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून जॅकवेल, मुख्य जलवाहिनी यांसारखी महत्त्वाची कामे पूर्णत्वास गेली आहेत. गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यात आले असून ते नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले आहे.
आता पुढील टप्प्यात नक्षत्रवाडी येथून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक क्लोरिन व तुरटीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी पीएसओ प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवरील बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे, स्कॉर व्हॉल्व्ह बदलणे आणि विविध ठिकाणी जोडणीची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
तसेच जलकुंभांशी अंतर्गत जोडण्या आणि १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणीही नियोजित पद्धतीने घेतली जाणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण होताच शहरात वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली