Citrus farmers are facing financial difficulties due to falling market prices
शुभम चव्हाण
छत्रपती संभाजीनगर: मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असलेला शेतकरी यंदाही वाचू शकला नाही. यंदा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर तर अक्षरशः संक्रांत कोसळली आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे मोसंबीची फळगळ झाली, तर सध्या दुसरीकडे बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
विशेषतः पैठण तालुक्यासह जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षी १० ते १५ लाख रुपये उत्पन्न देण-ारी बाग यंदा केवळ ३ ते ४ लाखांवर आली आहे. वर्षभराचा खर्चही एवढाच असल्याने लागवड टिकवणे कठीण झाले आहे. सध्या बाजारात मोसंबीला टनाला फक्त १५ ते २० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. शासनाकडून मिळणारी हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्ष नुकसान मात्र पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
आमचे प्रत्यक्ष नुकसान पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत झाले आहे. सरकार मात्र तुटपुंजी मदत देऊन आमची थट्टा करत आहे. सरकारने आता हे थांबवावे आणि आम्हाला प्रत्यक्षात मदत करावी.विठ्ठल गोरे, मोसंबी उत्पादक, शेतकरी.
५०० झाडांसाठी वर्षभरात चार लाख खर्च येतो. आजघडीला नफा नाहीच, पण खर्चही वसूल होत नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर बागेवर कुऱ्हाड चालवावी लागेल.- माऊली पाचोडे, मोसंबी उत्पादक, शेतकरी.
गेल्यावर्षी बागेने मला १२ लाख दिले. यावर्षी फक्त तीन लाख मिळाले. पावसाने आधी मारले, आता दराने जीव घेतला. भरघोस मदत करण्याऐवजी सरकार फक्त घोषणाच करत आहे.- पद्माकर शिंदे, मोसंबी उत्पादक, शेतकरी.
मोसंबीला कायमस्वरूपी भाव मिळावा यासाठी मोसंबीपासून बायप्रॉडक्ट तयार करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अन्यथा ही शेती टिकणार नाही. त्याचबरोबर मोसंबीसाठी हमीभाव जाहीर करावा आणि नुकसानभरपाई प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात द्यावी.- अप्पासाहेब गोरे, मोसंबी उत्पादक, शेतकरी.