वरठाण, पुढारी वृत्तसेवा: सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील तलावाच्या सांडभिंतीला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याने तलावाची पाणी कमी होत आहे उपाययोजना राबवून गळती थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वरठाण तलावामुळे अनेक जमीन ओलितखाली आल्या आहेत. खरीप पाठोपाठ अनेक शेतकरी रब्बीचे पीकदेखील घेतात. गेल्या चार पाच वर्षांपासून तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढल्याने तलावात चांगल्या प्रकारे पाणीसाठा होतो, पण तलावाच्या भिंतीला काही ठिकाणी मोठमोठे भगदाड पडले. लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. या वर्षी वरठाण परिसरात सुरुवातीपासून पावसाचे कमी प्रमाण कमी होते. या वर्षी तलाव भरणार की नाही अशी शंका व्यक्त करीत होते.
मध्यंतरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने एका रात्रीत तलाव ओव्हरफ्लो झाला. गळतीमुळे तलाव काही दिवसांतच कोरडेठाक पडतो. याआधी देखील सांडव्यास मोठी गळती गेल्या पाच वर्षांपूर्वी गळती झाली होती. हे थांबविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होत. झालेले काम दर्जेदार झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुन्हा तलावाच्या भिंतीस भगदाड पडल्याने पाणी वाहून जात असल्याने फेब्रुवारीमध्येच तलाव कोरडाठाक पड्झो. ग्रामस्थांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. हे दरवर्षीचे चित्र आहे.
या सांडव्याची गळती थांबवावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी केली होती. उपविभागीय अधिकारी रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता एस.बी. बुचाले, कालवा निरीक्षक एस.डी.बारेला यांनी तलावाच्या सांडभिंतीची, गळतीची पाहणी केली. यावेळी काही शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, वरठाण लघु सिंचन प्रकल्पाची पाहणी केली असून सांडवा लिकेज झालेला आहे. याची तत्काळ दखल घेऊन सांडवा दुरुस्ती कामी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, अशी माहिती शाखा अभियंता एस. बी. बुचाळे यांनी दिली.